सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती
सोलापूर, 21 जुलै (हिं.स.)। पश्चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी आणखी १०९१ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १९९१ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ची वेगाने अंमलबजावणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील ७१० उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाच हजार ९१५ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे लक्ष्य असून आतापर्यंत सात हजार ६६९ एकर शासकीय जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २७६ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी १९९१ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील २७६ उपकेंद्राच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा व शाश्वत वीज पुरवठा होणार आहे. सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांना संबंधित ग्रामपंचायत व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’चे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.