भोकरदन युवराज पगारे : शहरातील सिल्लोड कॉर्नर वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा नूतनीकरण सोहळा रविवारी 18 रोजी पूज्य भदंत एस प्रज्ञाबोधी,पुज्य भदंत शिवली शाक्यपुत्र तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.
तसेच यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचेही उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व उद्घाटक डॉ भीमराव आंबेडकर साहेब यांनी यावेळी भ्रमध्वनीद्वारे जनतेशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे होते तर आ संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी सभापती सुदमराव सदाशिवे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव,डॉ संजय पगारे,महेंद्र बनकर,चंद्रकांत पगारे, आशा माळी,रेखाताई पगारे, प्रा डॉ अंकुश जाधव, केशव जंजाळ,मुकेश चिने, इरफानोद्दीन सिद्दीकी,नानासाहेब वानखेडे, रमेश सपकाळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथम भदंत एस प्रज्ञाबोधी व भदंत शिवली शाक्यपुत्र यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर भदंतांनी बुद्ध धम्म वंदना घेतली. यावेळी प्रथम परम पुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्वेसर्वा सचिन पारखे यांनी आपल्या प्रास्ताविकात त्यांचे आजोबा रायभान पारखे यांनी जागा मिळविण्यासाठी व पुतळा उभा करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा आढावा घेत सदरील कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक दीपक बोर्डे, युवा नेते प्रदीप जोगदंडे तसेच सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळ, स्मारक समितीचे पदाधिकारी,भारतीय बौद्ध महासभा,डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन,सम्राट भोगवर्धन बुद्ध विहार समिती,सुजाता महिला मंडळ तसेच समस्त बौद्ध समाज शहर व तालुका या सर्वांचे आभार मानले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी सभापती सुदमराव सदाशिवे यांच्या भाषणाचा दाखला देत शहरातील बुद्धीविहार व पुतळ्यांच्या सुशोभीकरण करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. विहार समितीच्या वतीने तात्काळ समिती गठीत करावी असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनतेला केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी अत्यंत देखण्या सुशोभीकरण सोहळ्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. राजाभाऊ देशमुख, हर्षकुमार जाधव यांनी ही आपले विचार मांडले.
त्यानंतर अंत्यत उत्साहात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्युत रोषणाई व डीजेच्या तालावर तरुणाई अत्यंत उत्साहात थिरकली.
कार्यक्रमास शहर व तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला त्यात महिलांची संख्या मोठी होती हे विशेष.
दरम्यान, रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री राजेश टोपे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.