साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनात हजेरी लावली होती. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणेने केलेल्या तपासणीच्या अतिरेकाने चक्क संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हेच व्यासपीठावर येऊ शकले नाहीत. चपळगावकर यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी पोलिसांना विनंती करूनही त्यांनी गाडी मुख्य मांडवापर्यंत येऊ दिली नाही. पर्यायाने या कार्यक्रमापासून दूर राहणेच चपळगावकर यांनी पसंत केले.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. या गोंधळाचा परिणाम मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आणि उद्घाटन सत्रावर झाला होता.
रविवारी (ता. ५) फडणवीस यांच्या कार्यक्रमात या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रचंड सतर्क झाली होती. संमेलन नगरीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशद्वारावर कसून तपासणी केली जात होती. याचा फटका ८५ वर्षांच्या संमेलनाध्यक्षांनाही बसला.
आज धीर संपला आणि पोलिसांना ओरडले
‘‘गेली दोन दिवस सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या ८५ वर्षांच्या बाबांना आणि त्यांच्या ८८ वर्षांच्या मित्राला डॉ. सुधीर रसाळ यांना वेळोवेळी अडवण्यात आले. मुख्यमंत्री आले तेंव्हा ९०० पोलिस होते, आज उपमुख्यमंत्री येणार म्हणून होते.
मी प्रत्येकवेळी पोलिसांना समजावून, विनंती करून, ओरडून मार्ग काढला. आज धीर संपला आणि पोलिसांना ओरडले, चालणार नाहीत ते. चालू शकणार नाहीत एवढे अंतर. बिचारे पोलिस आदेशाचे पालन करत होते. ते बावचळले आणि जा म्हणाले. बाबांना काहीही फरक पडला नाही. गाडी शेवटी ग्रंथ प्रदर्शनाकडे वळली’’, अशी बोलकी प्रतिक्रिया भक्ती चपळगावकर यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे.
आज धीर संपला आणि पोलिसांना ओरडले
‘‘गेली दोन दिवस सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या ८५ वर्षांच्या बाबांना आणि त्यांच्या ८८ वर्षांच्या मित्राला डॉ. सुधीर रसाळ यांना वेळोवेळी अडवण्यात आले. मुख्यमंत्री आले तेंव्हा ९०० पोलिस होते, आज उपमुख्यमंत्री येणार म्हणून होते.
मी प्रत्येकवेळी पोलिसांना समजावून, विनंती करून, ओरडून मार्ग काढला. आज धीर संपला आणि पोलिसांना ओरडले, चालणार नाहीत ते. चालू शकणार नाहीत एवढे अंतर. बिचारे पोलिस आदेशाचे पालन करत होते. ते बावचळले आणि जा म्हणाले. बाबांना काहीही फरक पडला नाही. गाडी शेवटी ग्रंथ प्रदर्शनाकडे वळली’’, अशी बोलकी प्रतिक्रिया भक्ती चपळगावकर यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे.