बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी हभप. भारतीताई आडसुळ यांचे अत्यंत प्रेरणादायी, भावस्पर्शी व विचारप्रवर्तक कीर्तन उत्साहात संपन्न झाले.
या कीर्तनातून ग्रामस्थ व स्वयंसेवकांना नवी ऊर्जा, नवी दिशा आणि समाजकार्याची नवी प्रेरणा मिळाली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील आशयपूर्ण दाखले देत त्यांनी समाजप्रबोधनाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे उपस्थितांपुढे मांडले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना त्यांनी ठामपणे सांगितले की, आजच्या युवकांनी जर समाजाचे भान ठेवून, निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि राष्ट्रभावनेने काम केले, तर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांसारखा नेतृत्वगुण संपन्न महामानव जन्माला येईल आणि त्यांचे मावळे होण्याची संधी आपल्यालाही मिळेल. या शब्दांनी उपस्थित युवकांमध्ये नवी स्फूर्ती संचारली.
आजच्या युवकांनी आपल्या जीवनाची वाटचाल करताना आई-वडील व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखालीच पुढे जावे, संस्कारांची कास धरुन प्रगती करावी, असा मौलिक संदेश त्यांनी दिला. तसेच सोशल मीडियाचा वापर आवश्यक असला तरी त्याचा अतिरेक टाळावा, वेळेचा सदुपयोग करावा व जीवनात शिस्त आणि संयम पाळावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, संस्कार, सामाजिक बांधिलकी, कर्तव्यभावना, राष्ट्रप्रेम आणि सेवाभाव यावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने व ज्वलंत उदाहरणांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
या कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अश्विनी मंडलिक, उपसरपंच श्री. जितेंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















