सोलापूर – शहरातील नागरी प्रश्न आणि लोकभावनांना वाचकांच्या पत्रांद्वारे वाचा फोडणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. फैय्याज शेख लिखित ‘जनमत’ आणि अरुण धुमाळ लिखित ‘पत्र प्रबोधन’ या पुस्तकांचे प्रकाशन शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असल्याची माहिती मंचाचे कार्यवाह सुनील पुजारी यांनी दिली.
या दोन्ही पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ५-३० वाजता श्री. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते संपन्न होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी भूषवणार आहेत. याप्रसंगी गॅस्ट्रोइंट्रोलॉजि आणि हेपॅटोलॉजिचे डॉ. सूर्यप्रकाश कोठे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वृत्तपत्रांमधील ‘वाचकांची पत्रे’ हा स्तंभ लोकशाहीचा आरसा मानला जातो. फैय्याज शेख आणि अरुण धुमाळ या दोन्ही लेखकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या धारदार लेखणीतून सोलापूर शहराचे जळजळीत प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत. ‘जनमत’ आणि ‘पत्र प्रबोधन’ या पुस्तकांच्या माध्यमातून हे ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भातील संकलन आता वाचकांसाठी उपलब्ध होत आहे.
”शहराच्या विकासासाठी आणि समस्यांच्या निराकरणासाठी वृत्तपत्र लेखकांनी दिलेले योगदान या पुस्तकांच्या निमित्ताने समाजासमोर येणार आहे. या सोहळ्याला सोलापूरकर नागरिक, वाचक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन सुनील पुजारी यांनी केले आहे.



















