किनवट : शहरातील शिवाजी नगर परिसरात रेल्वे प्रशासनाने नुकताच तयार केलेला रेल्वे अंडर ब्रिज नागरिकांसाठी सुविधा ठरण्याऐवजी मोठा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. अंडरब्रिज तयार झाल्याने वाहतुकीस अडचण दूर होईल, अशी अपेक्षा होती; मात्र सध्या या ठिकाणी “अडचण नसून खोळंबा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या १०० मीटरच्या अंतरावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत असून यामुळे प्रवासी व परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
अंडरब्रिज परिसरात सध्या रस्त्याचे योग्य प्रकारे सिमेंट काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण झालेले नसल्याने वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे धुळीचे मोठे लोट उडत आहेत. दुचाकीस्वार, रिक्षाचालक, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांत जळजळ, अॅलर्जी यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच धुळीमुळे वाहनचालकांची दृष्टी कमी होत असल्याने अपघात होण्याची शक्यताही वाढली असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने अंडरब्रिज परिसरात आणखी एक सिमेंट काँक्रीटचा थर टाकून योग्य प्रकारे क्युरिंग करावे अथवा दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दिनकर चाडावार यांनी इशारा देताना सांगितले की, रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येचे निराकरण न केल्यास शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, अंडरब्रिज परिसरातील नागरिकांनीही या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “अंडरब्रिज झाल्याने सोय होईल असे वाटले होते, मात्र सध्या धुळीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

















