सोलापूर – शिवसेनेकडून प्रा. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. राज्यसभा खासदार झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेल्या वाघमारे यांचे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे हे महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे. शिवसैनिक हाच आमचा धर्म, हाच वारसा एकनाथ शिंदेंनी पुढे नेला आहे. गरीब मागासवर्गीय वस्तीत राहणाऱ्या मुलीला, गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात. काही नेते आपल्या कुटुंबाला आपला पक्ष असतात, तर काही नेते आपल्या पक्षाला कुटुंब समजतात, असे खासदार ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
आजोबांनी रस्त्यावर बसून चपला शिवल्या… वडिलांनी वेटर म्हणून काम केलं आणि आई गिरणी कामगार म्हणून परिस्थितीशी झगडत राहिली. मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मला राज्यसभेची उमेदवारी दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला उमेदवारी देऊन शिवसेनेत जातीपतीला थारा नाही, हे शिंदे यांनी दाखवून दिले आहे, अशी भावना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, आयुष्यातील 30-35 वर्षे या झोपडपट्टीत गेली, याच झाडाखाली बसून 10 वी ते पीएच.डी.चा अभ्यास केला. वडील नगरसेवक झाले तरी घरं मातीचं होतं. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका झोपडपट्टीतील मुलीला राज्यसभेत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
वाघमारे म्हणाल्या, सोलापूर ही माझी मायभूमी आहे, त्यामुळे माझ्या मायभूमीला नतमस्तक होण्यासाठी मी आलेय. सोलापूरकरांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, प्रत्येक भूमिकेत त्यांनी मला स्वीकारलेलं आहे. दिल्लीत गेल्यावरही मी सोलापूरला कधी विसरणार नाही, सोलापूरचा स्वाभिमान मी दिल्लीत मिरवेन.
मी राजकन्या नाही, संघर्षकन्या आहे. गरिब आई-बापाची पोरगी आहे. माझा बाप मोठा नाही, मी बंगल्यात राहणारी नाही, माझं घरं फाटकं आहे. वस्तीतला लोकांच्या कष्टाची जाणीव मला आहे, प्रत्येक कष्टकऱ्याच्या प्रश्नाला मी दिल्ली दरबारी आवाज उठवेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.






















