सांगोला – महिलांना प्रसंगी काली, शारदा आणि लक्ष्मी ही तीन रूपे अंगीकारून वागावे लागते. पूर्वी महिलांना सन्मानाचे जीवन मिळत नव्हते. या महिलांना एकत्र आणून सहविचार केंद्र सुरू केले आणि प्रथम त्यांच्या मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू करण्यात आले आणि ते यशस्वीपणे चालवले. याच पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानची स्थापना झाली असल्याचे प्रतिपादन संस्थापिका डॉ.संजीवनी केळकर यांनी केले. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला यांच्या वतीने आयोजित चैत्र गौरी पूजन व हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी दीर्घकाळानंतर सहविचार केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत कुटुंब व्यवस्थेतील महिलांची भूमिका या विषयावर मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा प्रा.नीलिमा कुलकर्णी तर तहसीलदार बाळूताई भागवत, डॉ.स्मिता गव्हाणे, खजिनदार शालिनी कुलकर्णी, सचिव वसुंधरा कुलकर्णी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ.स्मिता गव्हाणे यांनी महिलांची कुटुंबातील बहुआयामी भूमिका सांगत या कार्यक्रमात डाळ व पन्हे देण्यामागील शास्त्रीय कारण सांगत पुरुषांनीही महिलांना घरकामात सहकार्य करणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी सहविचार केंद्राच्या विजया बनसोडे, विजया खडतरे, सुमन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी कवठेकर यांनी केले. आभार अश्विनी कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम महिला सक्षमीकरण, कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारित असल्याने उपस्थितांना नवी ऊर्जा व प्रेरणा देऊन गेला.
महिलांनी अनावश्यक जबाबदाऱ्यांचे ओझे न घेता आत्मविश्वासाने निर्णय घ्यावेत. स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवावा व प्रगल्भ व्हावे. मुलांना महिलांचा आदर करण्याचे संस्कार द्यावेत. आपले अनुभव व ज्ञान पुढील पिढीला द्यावे. शरीराकडे लक्ष द्यावे. वयाच्या चाळिशीनंतर आरोग्यविषयक समस्या येऊ नयेत म्हणून नियमित व्यायाम व संतुलित आहार घ्यावा. स्वतःवर प्रेम करावे.
– बाळूताई भागवत, तहसीलदार, सांगोला


























