वाळूज – मोहोळ ते वैराग या महत्त्वाच्या दळणवळणाच्या मार्गावर मालिकपेठ येथे रेल्वे पुलाजवळ सिमेंट रस्त्याची अत्यंत धोकादायक अवस्था उघडकीस आली आहे. रस्त्याच्या पृष्ठभागातून लोखंडी रॉड उघडे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, हा रस्ता अक्षरशः अपघाताला आमंत्रण देणारा ‘जीवघेणा सापळा’ ठरत आहे.
हा रस्ता प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि व्यापारी वर्ग या मार्गाचा नियमित वापर करतात. अशा परिस्थितीत रस्त्याची ही बिकट अवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
सिमेंट रस्त्याच्या पृष्ठभागातून बाहेर आलेले धारदार लोखंडी सळई कोणत्याही क्षणी वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरू शकतात. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहनांचे टायर फुटणे, वाहन घसरणे, अचानक तोल जाऊन पडणे अशा घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. काही वाहनचालकांनी या ठिकाणी थोडक्यात बचाव झाल्याच्या घटनाही सांगितल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी काही काळापूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कालांतराने सिमेंटचा थर उखडून गेला असून आतील लोखंडी सळई उघड्यावर आल्या आहेत. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने काम पूर्ण झाल्यानंतर योग्य देखरेख न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
रात्रीच्या वेळी या ठिकाणी धोका आणखी वाढतो. अपुरी प्रकाश व्यवस्था, कोणतेही इशारा फलक नसणे आणि रस्त्यावर उघडे पडलेले रॉड—या सर्व बाबी अपघातासाठी पोषक ठरत आहेत. अंधारात वाहनचालकांना हे रॉड दिसत नसल्यामुळे अचानक अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याखाली लपलेले लोखंडी रॉड वाहनचालकांना दिसत नसल्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होतो. याशिवाय, या ठिकाणी रस्त्याला मोठे वळण असल्याने धोका आणखी वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर यंत्रणांनी तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा, नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा ठपका प्रशासनावर बसणार असल्याची तीव्र भावना परिसरात व्यक्त होत आहे.
इन बॉक्स : नागरिकांच्या तातडीच्या मागण्या-
•उघडे पडलेले लोखंडी रॉड तात्काळ काढून सुरक्षित करणे किंवा त्यांना कव्हर बसवणे.
•खराब झालेल्या सिमेंट रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे.
•धोकादायक ठिकाणी इशारा फलक, बॅरिकेड्स व रिफ्लेक्टर बसवणे•
•रात्रीसाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे.
•निकृष्ट कामासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणे
बाइट : दत्तात्रय कादे (स्थानिक नागरिक)
“मोहोळ-वैराग मार्गावर मालिकपेठ येथे रेल्वे पुलाजवळ सिमेंट रस्त्यातील लोखंडी रॉड उघडे पडले आहेत. दुचाकीवरून जाताना खूप भीती वाटते. टायर फुटण्याचा आणि घसरून पडण्याचा धोका कायम असतो. विशेषतः रात्री तर काहीच दिसत नाही. हे तात्काळ दुरुस्त करायला हवे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, ही आमची ठाम मागणी आहे.”





















