बार्शी – अवयव दानासारख्या जीवनदायी आणि मानवतेशी निगडित चळवळीला अधिक गती देण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी शाखेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. अजित आव्हाड यांनी केले. जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी शाखेच्यावतीने ‘श्रीमान रामभाई शाह’ रक्तपेढीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अध्यक्षस्थानी डॉ. बी. वाय. यादव, डॉ. विक्रम निमकर इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी शाखेचे सचिव अजित कुंकूलोळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनांट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
यावेळी ब्लड बँकेच्यावतीने डॉ. योगेश सोमाणी, डॉ. आनंद माने, डॉ. निनाद माढेकर, डॉ. अमित पडवळ, डॉ. अमृतराज जाधव, डॉ. रविराज कुंभार, डॉ. लैला तांबारे, डॉ. किशोर गोडगे, डॉ. लक्ष्मीकांत काबरा, डॉ. मुकुंद तांबारे, डॉ.भरत गायकवाड, डॉ चैताली मोरे, डॉ. शुभम निमकर, डॉ. विराज केसकर यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. अजित आव्हाड म्हणाले की, आजही समाजात अवयव दानाबाबत अनेक गैरसमज आणि भीती आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत जीव गमावत आहेत. इंडियन रेडक्रॉससारख्या विश्वासार्ह संस्थेने या चळवळीत सक्रीय सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण होईल आणि अवयव दानासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या वाढेल.
त्यांनी अवयव दान चळवळ प्रभावी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपायही सुचवले. त्यामध्ये अवयव दानाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवणे, इच्छुक व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करणे, नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी व लोकाभिमुख बनवणे तसेच स्थानिक रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे यांचा समावेश होता.
डॉ. आव्हाड यांनी बार्शी रेडक्रॉसच्या रक्तपेढीच्या कार्याचे विशेष कौतुक करताना सांगितले की, तालुका स्तरावर सर्व रक्तघटकांसह कार्यरत असलेली ही सर्वोत्तम रक्तपेढी आहे. रक्ताअभावी किंवा रक्तदानाअभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, हेच रक्तपेढीचे उद्दिष्ट आहे.
“ब्लड बँकेशिवाय डॉक्टर अपूर्ण” —डॉ. विजयकुमार केसकर
कार्यक्रमात बोलताना डॉ. विजयकुमार केसकर यांनी बार्शीतील रेड क्रॉस रक्तपेढीच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, स्वर्गीय डॉ. अण्णासाहेब कश्यपी, स्व. डॉ. हिरेमठ, स्व. डॉ. नेने आणि डॉ.काका कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून या रक्तपेढीची स्थापना झाली. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुर झालेल्या या सेवेला आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.
“ब्लड बँकेशिवाय डॉक्टर अपूर्ण आहे. डॉक्टर आणि ब्लड बँकेचे नाते अतूट आहे. या रक्तपेढीने कमी दरात विविध रक्तघटक उपलब्ध करून देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
४९ वर्षांची अविरत सेवा
यावेळी डॉ. केसकर यांनी सांगितले की, बार्शी रेडक्रॉस गेल्या ४९ वर्षांपासून रक्तपेढी, मूकबधिर विद्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांतून ग्रामीण भागात उल्लेखनीय सेवा देत देश पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.
कार्यक्रमा प्रशांत शेटे, धनुभाई शहा ,दिलीप कराड ,संतोष सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डहाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रताप जगदाळे यांनी केले.


























