बार्शी – आळस आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यास आपला देश जागतिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. ‘जागो हिंदुस्तानी’ सारख्या कार्यक्रमातून देशभक्तीची भावना कलेच्या माध्यमातून दृढ झाली आहे, असे प्रतिपादन मीरा भाईंदरचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बार्शीच्यावतीने आयोजित जागर महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूरच्या स्वरनिनाद या वाद्यवृंद मंचांनी देशभक्तीवर आधारलेल्या विविध गाण्यातून बार्शीकरांना मंत्रमुग्ध केले. तीन दिवसांच्या या जागर महोत्सवाचा प्रारंभ पुणे येथील श्रीपाद पद्माकार व गिरीश जाधव निर्मित विनोद रत्ना दिग्दर्शित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडला’ या नाटकाच्या सादरीकरणातून झाला.
जागर महोत्सवाचा शुभारंभ बार्शीचे आमदार दिलीप सोपल, अभिनेते विघ्नेश जोशी (ठाणे), नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. अर्चना आडके घाणेगांवकर सामाजिक कार्यकर्त्या सौ. उज्ज्वलाताई सोपल व पुण्याच्या गायिका सौ. जयश्री काळे यांच्या हस्ते झाला.
श्रेयश जोशी, समृद्धी कुलकर्णी व वैभव रंधवे यांनी प्रमुख भूमिका वठवलेल्या या नाटकामध्ये करिअरच्या मागे धावणाऱ्या परफेक्शनीस्ट स्त्रीच्या महत्त्वकांक्षा आणि तिला अभिप्रेत असणारा प्रॅक्टिकल आणि परफेक्ट जोडीदार यांच्या शोधातून निर्माण झालेला यंत्रमानव आणि आधुनिक काळातील ताण-तणाव यांचे दर्शन प्रेक्षकांना झाले.
दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या स्वरनिनाद प्रस्तुत शब्दसुरांच्या झुल्यावर हा गेली ३६ वर्षे मराठी अभिजात गाण्यांची सुरेल परंपरा असलेला, गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. भारतभूषण शेंबेकर यांच्या निवेदनाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.
याप्रसंगी सोलापूर नाट्य परिषदेचे विजय साळुंखे, अजय दासरी, समद फुलमामडी, पंढरपूरचे दिलीप कोरके, मंगळवेढ्याच्या सौ. तेजस्विनी कदम व यतिराज वाकळे उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बार्शीचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगांवकर यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी आमरावती’ या संस्थेच्यावतीने घोषित झालेल्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिजिटल मीडिया संस्थापक अध्यक्ष व नाट्य परिषद शाखा बार्शीचे उपाध्यक्ष राजा माने, प्रमुख कार्यवाह विजयश्री पाटील, अनिल जोशी, सूर्यकांत वायकर, प्रशांत ढोले, सतीश होनराव, ममता चोप्रा, उल्का डोंबे यांनी परिश्रम घेतले. तीन दिवसांच्या कार्यक्रमातील स्वागत व सत्काराचे निवेदन बार्शी नाटय शाखेच्या प्रमुख कार्यवाह विजयश्री पाटील यांनी केले. हा कार्यक्रम बार्शीच्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडला.

























