बार्शी – दि. १० मे १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बार्शी शहरात झालेल्या ‘मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत’ देशांतर, धर्मांतर आणि नामांतर या विषयांवर ऐतिहासिक भाषण केले होते.
या महत्त्वपूर्ण घटनेला १०२ वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने बार्शीत तिसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल (बार्शी शहर व तालुका शाखा) आणि नालंदा स्तूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात ही परिषद सालाबादप्रमाणे संपन्न झाली. मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन परिषदेचे उद्घाटन बुद्धसृष्टीचे भंते आर्या मेत्ताजी व त्यांच्या उपासिका संघाच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर जिल्हा (पूर्व) अध्यक्ष सत्यजित लिंबा जानराव हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे धाराशिव उत्तरचे अध्यक्ष लक्ष्मण धावारे, सोलापूर जिल्हा (पूर्व) सरचिटणीस बाबासाहेब क्षीरसागर, महिला जिल्हाध्यक्षा निर्मलाताई कांबळे, धम्मरक्षिताताई कांबळे, स्वाती जगझाप, नंदा काटे, जगन्नाथ शिंगे, समता सैनिक दलाचे सोलापूर शहर प्रमुख बाबू रणखांबे, समाधान गायकवाड, सोमनाथ गायकवाड, प्रसाद लांबतुरे, शिवशरण ताई, थोरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी लक्ष्मण धावारे, नंदाताई काटे, धम्मरक्षिताताई कांबळे, बाबासाहेब क्षीरसागर, स्वातीताई जगझाप आणि अध्यक्ष सत्यजित जानराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले विचार मांडले.
धम्मात विनयाचे महत्त्व मोठे -भंते आर्या मेत्ताजी
कार्यक्रमाच्या शेवटी धम्मदेसना देताना भंते आर्या मेत्ताजी यांनी बुद्धवंदनेचे महत्त्व आणि बौद्ध धम्मात ‘विनयाचे’ (शिस्तीचे) महत्त्व किती मोठे आहे, हे विशद केले. “बौद्ध धम्म चळवळीत कार्य करणाऱ्यांनी सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञ आणि विनम्र असायला हवे,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
या परिषदेत बार्शी शहर आणि तालुक्यातील धम्म व मानवतेचे कार्य करणाऱ्या निवडक संस्था आणि व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच, ‘संविधान मालिके’ची निर्मिती करुन समाजात संविधानाच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणारे अश्वकुमार आहिरे यांचा भंते आर्या मेत्ताजी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विश्वास वाघमारे यांनी केले. ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष सचिन पालके, उपाध्यक्ष शंकर वाघमारे, महिलाध्यक्षा कल्पना तुपिरे, जिल्हा सचिव शामलताई भोसले, निर्मला वाघमारे, राजश्री राजगुरु, चंद्रकला जाधव, वैशाली जानराव, वंदना वाघमारे, रमा खुने, प्रसाद शिंदे, विजय पालके, वृत्तांत वाघमारे, सचिन जानराव, समाधान ननवरे, आनंद जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

























