माचणूर भीमा नदी पुलावरुन बेगमपुर येथिल एका तरुणाने दारुच्या नशेत उडी मारुन केली आत्महत्या
तभा वृत्तसेवा
मंगळवेढा दिनांक 21 मे 2026
माचणूर येथील भीमा नदी पुलावरुन एका 32 वर्षीय तरुणाने दारुच्या नशेत नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील खबर देणारे दत्ता तुळशीराम माने (रा.घोडेश्वर) यांचा भाचा कुमार नेताजी साळुंखे (वय 32 वर्षे) याने दि.18 मे रोजी दुपारी 3 वाजता माचणूर येथील भीमा नदी पुलावरुन भीमा नदीच्या पात्रात दारुच्या नशेत उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगीतले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
————–
व्यवसायासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी २७ वर्षीय विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी चौघा विरुध्द गुन्हा दाखल
तभा वृत्तसेवा
मंगळवेढा दिनांक 21 मे 2026
व्यवसायाकरिता माहेरहून 10 लाख रुपये घेवून ये या कारणास्तव एका विवाहितेचा शारीरिक,मानसिक छळ करुन पतीने दुसरे लग्न केल्या प्रकरणी पती प्रेमनाथ भगवान इंगोले, सासू सुमित्रा भगवान इंगोले, दीर दादाराव भगवान इंगोले,जावू जयश्री दादाराव इंगोले (सर्व रा.तेली गल्ली सांगोला) या चौघा विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी माया प्रेमनाथ इंगोले (वय 27 वर्षे,सध्या रा.गोणेवाडी) हिचा विवाह दि.12 जुलै 2020 रोजी सांगोला येथील प्रेमनाथ भगवान इंगोले याच्याशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नाच्या वेळी फिर्यादीच्या वडिलांनी कपडे,एक तोळा सोन्याचे गंठण,एक तोळा सोन्याचे लॉकेट व मानपान केला होता. तद्नंतर पतीने फिर्यादीस सांगोला येथे नांदवण्यास घेवून गेले. फिर्यादीचे पती हे यात्रेच्या ठिकाणी पाळणे लावून कमाई करत होते. त्यावर कुटूंबाची उपजिवीका चालत होती. लग्नानंतर साधारणत: आठ दिवस फिर्यादीस सासरी चांगले नांदवले, त्यानंतर नवरा प्रेमनाथ ,सासू सुमित्रा,दीर दादाराव,जावू जयश्री यांनी व्यवसायासाठी पाळणे खरेदी करण्याकरिता माहेरहून 10 लाख रुपये घेवून ये असे म्हणून फिर्यादीचा शारीरिक,मानसिक छळ केला. आरोपी तथा पती प्रेमनाथ याने दि.30 एप्रिल 2026 रोजी खरसुंडी येथील ज्योती माणिक शिंदे हिचेसोबत आळंदी जि.पुणे येथे दुसरे लग्न केले. याबाबत फिर्यादीने पतीस विचारणा केली असता शिवीगाळी,दमदाटी करुन आम्हाला तुझी गरज नाही असे म्हणून राहते घरातून हाकालून दिल्याने दि.6 मे 2026 रोजी फिर्यादी ही माहेरी गोणेवाडी येथे आई वडिलाकडे येवून राहत असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
—————
भांडणे मिटवण्यास गेलेल्या एका वृध्दाच्या डोक्यात काठी घालून केले गंभीर जखमी
तभा वृत्तसेवा
मंगळवेढा दिनांक 21 मे 2026
भांडणे सोडविण्यास गेलेल्या एकास डोकीत काठी मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी पंढरीनाथ इंगवले (रा.पाठखळ) याच्या विरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी भारत भोसले (वय 70 वर्षे) यांचा मुलगा प्रताप व सून कल्पना यांची दि.14 मे रोजी रात्री 8 वाजता भांडणे लागली होती. त्यावेळी भांडणे मिटविण्याकरिता फिर्यादी हे भारत खुळे यांच्या वस्तीवर गेल्यावर भांडणे मिटवत असताना यातील आरोपी पंढरीनाथ इंगवले याने चिडून जावून माझे मुलीस तुम्हीच त्रास देत आहात,तुम्हाला बघून घेतो अशी धमकी,शिवीगाळी करुन त्याच्या हातातील काठी डोकीत मारुन गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस नाईक बाबर हे करीत आहेत.
————-
मंगळवेढा बसस्थानकावर महिला एजंटदाराच्या कुचराईपणामुळे महिला प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचे काम झाले ठप्प
प्रवाशी वर्गातून मोठा होतोय संताप व्यक्त……
तभा वृत्तसेवा
मंगळवेढा दिनांक 21 मे 2026
मंगळवेढा बसस्थानकावर महिला प्रवाशी व जेष्ठ नागरिक यांना एन.सी.एम.सी.कार्ड देण्याचे काम मागील काही दिवसापासून कामकाज ठप्प असल्याने कार्ड काढण्यासाठी येणार्या महिला प्रवाशी व जेष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान महिला प्रवाशांची 500 ते 600 कार्ड येथे आली असून त्यांना अॅक्टीव्हेट न केल्यामुळे महिला प्रवाशी वर्ग बसस्थानकाचे उंबरठे झिजवत आहेत. दरम्यान या घटनेबाबत मंगळवेढ्याचे आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांनी सोलापूरचे विभागी्य नियत्रंक यांना कळवून नव्याने प्रतिनिधी नेमून येथे जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची होणार गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. प्रवाशी महिला व जेष्ठ नागरिक यांना स्मार्ट कार्ड अर्थात एन.सी.एस.सी.कार्ड नोंदणीकरिता सोलापूर जिल्ह्यासाठी अधिकृत प्रतिनिधी (एजंट) श्रीकांत सद्डू यांची नेमणूक केली असून त्यांनी मंगळवेढा बसस्थानकासाठी उपएजंटदार सुष्मा आनंद गिड्डे या महिलेची नेमणूक केली आहे. सदर एजंटदार महिला मागील काही दिवसापासून येथील कामकाजच बंद केल्यामुळे महिला प्रवाशी व जेष्ठ नागरिक यांना या योजनेचा लाभ घेणे मुश्किल बनले आहे. आगार प्रमुख यांनी वारंवार सदर महिलेस कॉल करुन कामकाजाबाबत सुचना करुनही त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असून फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. सध्या 700 ते 800 प्रवाशांची नोंद कार्डासाठी झाली असून सध्या 500 ते 600 कार्ड तयार होवून अॅक्टीव्हेट करण्यासाठी आले आहेत. हे कार्ड अॅक्टीव्हेट करण्याची जबाबदारी संबंधीत महिला एजंटदाराची असताना अद्यापही त्यांनी ते कार्ड अॅक्टीव्हेट केले नसल्यामुळे बसस्थानकावर ढिगारा पडून असल्याचे चित्र आहे. कार्ड त्वरीत मिळावे यासाठी महिला प्रवाशी जेष्ठ नागरिक बसस्थानकाचे उंबरठे झिजवत आहेत. या घटनेबाबत लोकप्रतिनिधीकडूनही वारंवार आगारप्रमुखांना विचारणा होत आहे. या सर्व तक्रारीमुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येत असल्याचे आगार प्रमुखांनी सोलापूर विभागीय नियंत्रकाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
——————–
सद्गुरुच्या बैठकीस गेलेल्या पत्नीस आणावयास निघालेल्या पतीस कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू
अज्ञात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल….
मंगळवेढा – सद्गुरुच्या बैठकीस गेलेल्या पत्नीला आणावयास मोटर सायकलवर चाललेल्या पतीस मंगळवेढा-आंधळगाव या महामार्गावर कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने नारायण साधू चव्हाण (वय 63,रा.शेलेवाडी) हे गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी संतोष नारायण चव्हाण यांचे वडिल तथा मयत नारायण साधू चव्हाण हे दि.19 रोजी सकाळी 10.30 वाजता आंधळगाव -मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना मोटर सायकल क्रमांक एम.एच.13 ए. आर.4309 नडगिरे हॉस्पिटलजवळ कार क्रमांक एम.एच.19 ई.जी. 8320 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कारगाडी हयगयीने,निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून स्कूटी गाडीचे दहा हजाराचे नुकसान करुन नारायण चव्हाण यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असून अपघाताची खबर न देता तो निघून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार धनंजय आवताडे हे करीत आहेत.
Post Views: 8