सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या संघाने रत्नागिरीचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. सौख्या इंडीची भेदक गोलंदाजी आणि मुग्धा पाटीलच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर सोलापूरने हा सामना एकतर्फी जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरीचा संघ सोलापूरच्या अचूक गोलंदाजीसमोर ३० षटकांत सर्वबाद ११३ धावाच करू शकला. रत्नागिरीकडून अमलने सर्वाधिक ३० धावा आणि सानवी मांडवकरने १८ धावांचे योगदान दिले. सोलापूरच्या सौख्या इंडीने अवघ्या ३२ धावा देत ५ बळी टिपले आणि रत्नागिरीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तिला प्रनती गांजेने २ बळी घेत उत्तम साथ दिली.
विजयासाठी मिळालेले ११४ धावांचे आव्हान सोलापूरने अवघ्या १९.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. सोलापूरची सलामीवीर मुग्धा पाटीलने ७४ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रत्नागिरीकडून अमलने ३ बळी घेतले, मात्र ती संघाचा पराभव टाळू शकली नाही. घातक गोलंदाजी करत ५ बळी घेणाऱ्या सोलापूरच्या सौख्या इंडी हिला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.






















