माळशिरस –

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात माळशिरस तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष देविदास ढोपे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची मर्यादा न ठेवता सर्वांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच एकरकमी समायोजन योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही सवलतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय कर्जमाफीसाठी चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करावी, २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि पीकविमा योजनेतील जाचक अटी हटवून योजना पूर्ववत सुरू करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post Views: 13