सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याण क्षेत्रात मोठी प्रगती झाली. देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना आणि लखपती दीदी योजनेचा उल्लेख करत मोदी सरकारने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या सोलापूर विमानतळ, रेल्वे उड्डाणपूल, ई-बस, आयटी पार्क आणि शेतकऱ्यांच्या एफआरपीसह विविध स्थानिक प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी भूमिका मांडली.
दरम्यान, पत्रकारांनी सोलापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधा आणि विमानसेवा बंद होण्याच्या शक्यतेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना गोरे म्हणाले की, नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधा उभारण्यासाठी काही अडथळे असून संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करून विमानसेवा सुरू ठेवता येणार नाही. न्यायालयाने घातलेली स्थगिती उठल्यानंतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण केली जातील,असे त्यांनी स्पष्ट केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक आणि आसरा चौकातील रेल्वे उड्डाणपुलांच्या रखडलेल्या कामांबाबत विचारले असता, संबंधित कंत्राटदारांना निश्चित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तांत्रिक अडचणी आणि विविध विभागांच्या परवानग्यांमुळे कामाला विलंब होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्क हे शहरात असावे असे म्हटले आहे. होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्कबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना पालकमंत्री गोरे यांनी मंजूर झालेल्या जागेवरच आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस विधान परिषद निवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार तथा माजी आ. राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार- सावंत, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, मनीष देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम मिळेल
शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एफआरपीचा एकही रुपया कमी दिला जाणार नाही. आर्थिक अडचणींमुळे काही कारखान्यांकडून विलंब झाला असला, तरी शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी दिले.
विरोधकांचा अभ्यास कमी असल्याचा आरोप
विरोधकांकडून वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक धोरणांवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना गोरे यांनी, विरोधकांचा अभ्यास कमी आहे. विरोधक हे देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करत कोरोनासारख्या संकटातही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहिली, असा दावा पालकमंत्री गोरे यांनी केला.
.. आणि त्या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर हास्याचे फवारे उडाले
विरोधी पक्ष म्हणतोय की देशामधली फॅसिस्ट विचारधारा ही देशाला कुठल्यातरी वेगळ्या विचारधारेकडे घेऊन जातेय आणि हे सर्वसामान्य लोकांना खाईमध्ये घालणारे आहे. म्हणजे विरोधकांची भूमिका ही चुकीची आहे का फॅसिस्ट विचारधारा ही जोपासणाऱ्या लोकांची भूमिका चुकीची आहे ? या एका पत्रकाराच्या प्रश्नावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आता हा तुमचा प्रश्न आंतरराष्ट्रीय असल्याचे स्पष्ट करताच हास्याचे फवारे उडाले.
Post Views: 27