बार्शी – सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गोरगरीब नागरिकांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा अवैध साठा करुन तो विक्रीसाठी वाहतूक केला जात असल्याच्या संशयावरुन बार्शी तालुका पोलिसांनी महसूल व पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकासह फपाळवाडी शिवारात मोठी कारवाई केली. या कारवाईत १० हजार ६५० किलो गहू, ८ हजार ४५० किलो तांदूळ आणि २०० किलो उडीद, तसेच एक ट्रक व एक पिकअप असा एकूण ३१ लाख १५ हजार ९८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास तहसीलदार एफ.आर. शेख तसेच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, फपाळवाडी (ता. बार्शी) गावच्या शिवारात रेल्वे स्टेशनसमोर, अरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मांगडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशनच्या धान्याचा साठा करण्यात आला आहे. हा माल ट्रक व पिकअप वाहनामध्ये भरुन विक्रीसाठी नेण्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली.
सायंकाळी सुमारे ७.२० वाजता पथक घटनास्थळी पोहोचले असता पत्राशेडसमोर टाटा ट्रक क्रमांक एमएच ११ एम ६४९२ आणि महिंद्रा पिकअप क्रमांक एमएच १० ए क्यू ८११२ उभे असल्याचे आढळले. या वाहनांमध्ये पत्राशेडमधून गहू व तांदळाची पोती भरली जात होती. यावेळी धनाजी अर्जुन मांगडे, गजेंद्र अरुण मांगडे, ट्रक चालक चांगदेव पिराजी दळवी व क्लिनर गणेश श्रीहरी कदम हे तेथे आढळून आले.
पंचांच्या उपस्थितीत वाहनांची व पत्राशेडची पाहणी केली असता ट्रकमध्ये १९५ पोती गहू, तर पिकअपमध्ये १५ पोती गहू व ४९ पोती तांदूळ आढळले. पत्राशेडमध्ये १२० पोती तांदूळ, ३ पोती गहू, खराब गव्हाची ३ पोती व ४ पोती खराब उडीद आढळून आला. तसेच ‘Madhya Pradesh State Civil Supplies Corporation Ltd.’ असे छापलेले पोते आणि दोन खाकी रंगाची पोतीही आढळली.
सदर धान्याबाबत संबंधितांकडे पावत्या, परवाने अथवा अन्य कागदपत्रांची मागणी केली असता कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच धनाजी मांगडे यांनी पत्राशेड व शेतजमीन आपली असल्याचे सांगितल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
पंचनामा करुन १० हजार ६५० किलो गहू, ८ हजार ४५० किलो तांदूळ आणि २०० किलो उडीद, तसेच ट्रक व पिकअप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त धान्याची एकूण किंमत ७ लाख १५ हजार ९८१ रुपये, तर दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत अनुक्रमे १६ लाख व ८ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड यांच्या फिर्यादीवरुन धनाजी अर्जुन मांगडे, गजेंद्र अरुण मांगडे, चांगदेव पिराजी दळवी आणि गणेश श्रीहरी कदम यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले धान्य रेशनचे असल्याचा संशय असून, त्याचा नेमका स्रोत आणि तो कुठे विक्रीसाठी नेला जाणार होता, याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप, तहसीलदार एफ. आर.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचूटे तसेच पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
Post Views: 9