पंढरपूर – आषाढीयात्रा जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. आषाढी वारीला पंढरपुरात लाखो वारकऱ्यांचा समुदाय येत असतो. त्यामुळं या वारकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने विविध कामांना सुरुवात केली आहे. यातील एक काम म्हणजे अतिक्रमण.गेल्या दोन दिवसांपासून ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून संयुक्तिकरित्या ही मोहीम राबवली जात आहे. मात्र, जेसीबीच्या सह्याने अतिक्रमण हटवण्यात आल्यानं पंढरपुरात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अतिक्रमण काढताना व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, त्यांची नुकसान भरपाई कोण देणार? असा सवाल नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केला आहे. प्रशासनाविरुद्ध नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र आले आहेत. अतिक्रमण हटवलेल्या व्यापाऱ्यांना घेऊन अधिकाऱ्यांशी नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा वाद सुरु आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून शहरात आणि पालखी मार्गांवर धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, जाहिरात फलक आणि कायमस्वरूपी झालेले अनधिकृत बांधकाम हटवून वारकऱ्यांना आणि नागरिकांना रहदारीसाठी मोकळे मार्ग उपलब्ध करून दिले जात आहेत. पंढरपुरात येणारे मुख्य रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, आणि विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटाव मोहिम सुरु असल्यानं व्यापाऱ्याचं नुकसान होत आहे. त्यामुळं पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक देखील आज रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यात आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
—————–
चौकट: (कारवाईनंतर नगराध्यक्षांसह सत्ताधारी आणि विरोधी आघाडीचे सर्व नगरसेवक एकत्र)
आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तिकरित्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यामध्ये जेसीबीच्या सह्याने अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईनंतर नगराध्यक्षांसह सत्ताधारी आणि विरोधी आघाडीचे सर्व नगरसेवक एकत्रित येऊन रस्त्यावर उतरले आहेत. अतिक्रमण हटवलेल्या व्यापाऱ्यांसोबत नगरसेवक व नगराध्यक्षांनी, व्यापाऱ्यांना अल्टिमेटमध्ये द्या मग अतिक्रमण काढा, अशी भूमिका घेतली आहे. तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता ही कारवाई केल्या असल्याचा देखील आरोप नगरसेवकांसह, नगराध्यक्षांनी केला आहे. त्यामुळं अतिक्रमण हटाव मोहिमेला अप्रत्यक्षरीत्या शहरातील नगराध्यक्षांसह नगरसेवक विरोध करत आहेत का? अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.






















