सोलापूर : महाराष्ट्राच्या वैभवशाली आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीसाठी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करत आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी धर्मादाय सामाजिक संस्था, सार्वजनिक न्यास, देवस्थाने आणि धर्मादाय रुग्णालयांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून पुढे यावे, असे आवाहन सोलापूर विभागाचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
आषाढी वारी धार्मिक सोहळा असून समाजसेवेची मोठी संधी असल्याचे सांगत सूर्यवंशी यांनी सेवाभावी संस्था, ट्रस्ट आणि स्वयंसेवी संघटनांनी पालखी मार्गासह पंढरपूर परिसरात वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, निवारा, विश्रांतीची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
ज्या सार्वजनिक न्यासांकडे इमारती किंवा मोकळ्या जागा उपलब्ध आहेत, त्यांनी त्या वारकऱ्यांच्या निवारा व विश्रांतीसाठी खुल्या कराव्यात. विशेषतः पंढरपूरमधील सार्वजनिक न्यासांनी या सेवाकार्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. तसेच दिंडी मुक्कामांच्या काळात प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धर्मादाय रुग्णालयांनी पालखी मार्ग, दिंडी मुक्कामस्थळे आणि पंढरपूर परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरे आयोजित करावीत. पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना अनेकदा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशा वेळी वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. वारकऱ्यांच्या सेवेतून समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्याची ही सुवर्णसंधी असून, सर्व धर्मादाय संस्था, देवस्थाने आणि रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणावर सेवा उपक्रम राबवावेत, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
प्रत्येक सेवाभावी संस्थेने
सामाजिक बांधिलकी जोपासावी
एखादा धर्मादाय ट्रस्ट किंवा सामाजिक संस्था स्थापन करण्यामागे समाजसेवेचा उद्देश असतो. आषाढी वारीसारख्या भव्य सोहळ्यात लाखो वारकऱ्यांना निवारा, अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रत्येक सेवाभावी संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे सर्व ट्रस्ट, सामाजिक संस्था आणि धर्मादाय रुग्णालयांनी स्वतःहून पुढे येऊन या सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले.
धर्मादाय संस्थांनी हे उपक्रम राबवावे
– वारकऱ्यांच्या सेवेसाठी धर्मादाय संस्थांना आवाहन
– आषाढी वारी सामाजिक उत्तरदायित्व
पार पाडण्याची सुवर्णसंधी
– महाप्रसाद, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था करा
– ट्रस्टच्या इमारती वारकऱ्यांसाठी खुल्या ठेवा
– मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करा
– सेवाभावी संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपावी
– वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा उभाराव्यात
– पंढरपूरात निवारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
– धर्मादाय रुग्णालयांनी मोफत औषधोपचार शिबिरे घ्यावीत
Post Views: 26