अकलूज – परम पूजनीय भंते ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघ यांच्या (ताडोबा अभयारण्य चंद्रपूर) यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्रांती अभियाना अंतर्गत भिमा कोरेगांव ते पंढरपूर पदयात्रेचे अकलूज मध्ये भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी अकलुजच्या सारनाथ बुध्द विहारात दिडीं मुक्काम राहील्यानंतर भंत्ते ज्ञानज्योती यांचे प्रवचन झाले.
आषाढी एकादशी निमीत्त सर्व संताच्या पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करीत आहे.याच दरम्यान सामाजिक क्रांतीचे अभियान हाती घेतलेले भंते जी भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या नेतृत्वाखाली 12 जुलैला भीमाकोरेगाव हुन पायी निघालेली धम्मयात्रेचे अकलूज शहरात आगमन झाले. यावेळी गांधी चौक येथे नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,नगरसेविका मनिषा तिकोटे,प्रियंका गायकवाड यांचेसह सारनाथ बुध्द विहाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.तदनंतर पदयात्रा अकलूज शहरातुन सारनाथ बुध्द विहारात पोहचल्यानंतर बुध्द वंदना होवून भंत्ते ज्ञानज्योती यांचे प्रवचन झाले.
यावेळी बोलताना भंत्ते ज्ञानज्योती म्हणाले पंढरपूरचा पांडुरंग हा बुध्द आहे तर विठ्ठल मंदिर हे प्राचिन बुध्द विहार आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम पणे सांगितले होते.ते सिध्द करण्यासाठी कामाच्या व्याप्तीमुळे बाबासाहेब आंबेडकरांना वेळ भेटला नाही, परंतु बाबासाहेंबाचं अपुर्ण काम पुर्ण करण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून करत आहे.ही लढाई मंदिर मागण्यासाठी नाही तर प्राचिन इतिहास सिद्ध करण्यासाठी आहे, आम्ही सिद्ध करायला चाललो आहे असे ते म्हणाले.
यावेळी पदयात्रेतील सर्व भंत्ते यांना बौध्द उपासकांनी फळे व मिठाई दान केली तर पदयात्रेतील सहभागी उपासकांना मिष्ठान भोजन व्यवस्था करण्यात आली होती.सोमवारी धम्मयात्रेचा सारनाथ विहारात मुक्काम झाला व त्यानंतर खंडाळी वेळापुर येथे विसावा घेत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.गुरुवार, दि.२३ जुलै रोजी पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे धम्म रॅलीद्वारे पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.