–
पंढरपूर – सद्यस्थितीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आज दुपारी १.३० वाजता धरणातून ७१ हजार ६०० क्यूसेक्स तर वीर धरणातून दुपारी २.०० वाजता ४२ हजार ८३३ क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा निरा नरसिंहपुर संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने उजनी व वीर धरणातील एकूण एक लाख १४ हजार ४३३ विसर्ग संगम येथून नदीपात्रात सुरू राहणार असून, असून भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे ,आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने भीमा नदीच्या काठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठी, नदीच्या पाण्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी, पंढरपूर तालुक्यातील नदीकाठी असणा-या गावातील नदीपात्रालगत राहणा-या रहिवासी व नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतीमार्फत, तात्काळ त्यांचे सर्व आवश्यक वस्तु-पशुधनासहीत सुरक्षित स्थळी स्थलांतरीत कराव्यात. तसेच त्यांना सुरक्षित स्थळी-आवश्यक्तेनुसार तात्पुरत्या निवारास्थळांचा शोध घेवून स्थलांतर करुन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.
तसेच पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठी पुर परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी असे आवाहनही तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
Post Views: 6