बार्शी – वेगाने विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधुनिक जगाची प्रत्यक्ष ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि तंत्रज्ञानाच्या नव्या संधींचा अनुभव घेता यावा या उद्देशाने बार्शी येथील एमआयटी व्हीजीएसच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राला (एआय सेंटर) शैक्षणिक भेट दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचा विविध क्षेत्रांमध्ये होणारा व्यापक उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावा हा या शैक्षणिक भेटीमागील प्रमुख उद्देश होता.
केंद्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगितली. तसेच दैनंदिन जीवनामध्ये एआयचा वाढता वापर, शिक्षण क्षेत्रातील बदल, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तसेच विविध व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या नव्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रात्यक्षिके पाहून एआयच्या आधुनिक जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या बदलांविषयी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात जिज्ञासू आणि सर्जनशील विद्यार्थी घडविणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा शैक्षणिक क्षेत्रभेटींमधून मिळणारा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यातील तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांची ओळख करून देत त्यांच्या विचाराला नवी दिशा देणारी ही ‘एआयच्या जगाची सफर’ एमआयटी व्हीजीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरली.