पुणे – सण-उत्सवांमध्ये रूढ झालेल्या डीजे, डॉल्बी आणि कर्कश ध्वनिक्षेपणासारख्या पद्धती एका दिवसात बंद करणे व्यवहार्य नसले, तरी लोकसहभागातून त्यांचे स्तोम निश्चितच कमी करता येऊ शकते. त्यासाठी सरकारने केवळ भूमिका स्पष्ट करून नियम आणि निर्बंधांपुरते मर्यादित न राहता व्यापक जनजागृती अभियान राबवावेत,असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.५) केले.
गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून साजरा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आवाहन स्वागतार्ह आहे. समाजातील बदल हा टप्प्याटप्प्याने घडतो. त्यामुळे उत्सव मंडळे, नागरिक, तरुणाई आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन सातत्यपूर्ण जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.
उत्सवांचा आनंद, धार्मिक भावना आणि सामाजिक परंपरा जपत ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, लहान मुले तसेच परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी स्वयंशिस्त निर्माण झाली पाहिजे. पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणे आणि संयमित उत्सवसंस्कृती रुजविणे हा त्याचाच एक भाग असावा, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, डीजे आणि डॉल्बीच्या कर्कश आवाज विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा पाटील यांनी तीव्र निषेध केला. मतभेद असले तरी हिंसाचाराला कोणतेही समर्थन असू शकत नाही. सामाजिक प्रश्नांवर संवाद, जनजागृती आणि कायदेशीर मार्गानेच तोडगा काढला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारची सकारात्मक भूमिका आणि समाजाचा सक्रिय सहभाग यांची सांगड घातल्यास पारंपरिक, शिस्तबद्ध आणि ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवसंस्कृती निर्माण होऊ शकते, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

















