करकंब – उत्सवाच्या काळात डिस्क जॅकी व डॉल्बीवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा वृक्षारोपणावर भर दिल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल.सोलापूर पोलिसांनी राबवलेले नो डिस्क जॅकी,नो डॉल्बी हे अभियान आता संपूर्ण राज्यात राबवले जात असून यंदाही ५ लाख झाडांच्या वृक्षारोपनाचा टप्पा पूर्ण करण्याचा विश्वास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला.करकंब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी विशाल नवले पोलीस उप अधीक्षक,प्रेरणा कट्टे अप्पर पोलिस अधीक्षक पंढरपूर,योगेश लंगुटे करकंब पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक,निलेश पोमणे पोलीस उपनिरीक्षक,पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.यावेळी पर्यावरणरक्षणासाठी यंदा पोलिसांच्या वतीने ५ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.गेल्या वर्षी ५ लाख झाडे लावली होती.यंदा आतापर्यंत ३ लाख झाडे लावून झाली आहेत.महिला सुरक्षा अन् सायबर गुन्ह्यांवर लक्ष.पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त असून ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढल्याचे सांगत महिला सुरक्षेसाठी पोलीस काका,पोलीस दीदी व निर्भया पथक सक्रिय असल्याचे मनोगत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेले करकंब पोलीस ठाण्याचे लँडलाईन नंबर तातडीने सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.सध्या सायबर गुन्हे हा ऑनलाईन दरोडाच बनला असून नागरिकांनी सतर्क राहावे तसेच गावोगावचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि हेल्पलाइनद्वारे पोलिसांशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
चौकट.
१००० झाडे लावा श्रीगणेशाच्या आरतीला आम्ही येऊ.
पर्यावरण संवर्धनासाठी यंदा ५लाख झाडे लावण्याचा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. या अनोख्या मोहिमेला प्रतिसाद मिळण्यासाठी १००० झाडे लावून त्यांचे योग्य रीतीने संगोपन केल्यास आम्ही श्रीगणेशाच्या आरतीला येऊ. करकंब येथील करकंब येथील या गणेश मंडळांनी १००० झाडे लावून हा उपक्रम यशस्वी केला आहे त्यांच्या श्री गणेशाच्या आरतीसाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे.
अतुल कुलकर्णी.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक.
चौकट.
डिस्क जॅकी व डॉल्बीचे दुष्परिणाम.
सततच्या कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे कानाचा पडदा खराब होणे.तीव्र आवाजाने हृदयाचे ठोके रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता.रात्री उशिरापर्यंत वाजविण्यात येणाऱ्या डिस्क जॅकीमुळे निद्रानाशाचा त्रास.विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कठीण.वृद्ध,नवजात बालके,रुग्णांचा जीव धोक्यात येतो.