बार्शी – तालुक्यातील आगळगांव परिसरात शनिवार दि. ४ एप्रिलच्या पहाटे पावसाने अक्षरशः थैमान घालत मोठे नुकसान घडवले. पहाटेच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होऊन जोरदार वादळी वारे, मुसळधार अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. काही काळासाठी विजांच्या चमकांमुळे आणि गडगडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याच दरम्यान, शेतकरी गणेश प्रकाश डमरे यांच्या शेतात अचानक विज कोसळून मोठी दुर्घटना घडली. गट क्रमांक २९६/४ मध्ये बांधून ठेवलेली त्यांची म्हैस आणि रेडीच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्युमुखी पडली.
या दुर्घटनेत सुमारे ७५ हजार रुपये किंमतीची म्हैस आणि २५ हजार रुपये किंमतीची रेडी असे एकूण अंदाजे एक लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसोबतच जनावरांवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही मोठी आर्थिक व मानसिक धक्का देणारी घटना ठरली आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल व पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तलाठी साहील पठाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल गोसावी, डॉ. मधुकर जाधवर तसेच पशुसेवक प्रदीप विष्णू गरड यांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला व नुकसानाची नोंद घेतली.
सध्या अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून, त्यासोबतच वादळी वारे व विजांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत होत असून, शेती व पशुधन या दोन्ही क्षेत्रांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः विजेच्या घटनांमुळे जनावरांचे तसेच मनुष्यहानीचे धोके वाढले आहेत.
दरम्यान, बाधित शेतकरी गणेश डमरे यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.















