सोलापूर : सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर येथे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा जागर करत भक्तिमय वातावरणात भव्य आणि पर्यावरणपूरक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “ज्ञानोबा-तुकाराम”, “जय जय रामकृष्ण हरी” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या अखंड नामघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर विठ्ठलमय झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) अश्विनी पाटील आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती व पालखीचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले व निखहत शेख, सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक डॉ. एस. एच. पवार, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रविंद्र व्यवहारे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाच्या रमन, कलाम, होमी आणि विक्रम या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संतपरंपरेचे आकर्षक दर्शन घडविले. भगव्या पताका, पालखी, टाळ-मृदंग, वीणा, लेझीम, फुगडी, रिंगण, अभंग आणि भारूड यांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक मूल्यांचा संदेश देणारे विविध फलक हातात घेत जनजागृती केली. “झाडे लावा, पर्यावरण वाचवा”, “वडिलधाऱ्यांचा सन्मान करा”, “नेहमी खरे बोला”, “मोबाईलमध्ये कमी गुंतूया, मैदानी खेळ खेळूया”, “व्यसनमुक्त समाज घडवूया”, “स्त्री-सन्मान हीच खरी संस्कृती”, “स्वच्छता राखा”, “राष्ट्रीय एकात्मता जपूया” अशा घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांनी समाजापुढे सकारात्मक संदेश ठेवला. पर्यावरणपूरक दिंडीच्या या संकल्पनेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेतून संतपरंपरेचे जिवंत दर्शन घडविले. प्रत्येक हाऊसने वारीचे महत्त्व, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, स्त्री-सन्मान आणि भारतीय संस्कृतीचे जतन या विषयांवर आधारित देखावे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्या अश्विनी पाटील यांनी आपल्या मनोगतात वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक परंपरा नसून शिस्त, सेवा, समता, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा महान सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगितले. आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
पालखी मिरवणूक, रिंगण सोहळा, अभंग गायन, भारूड, हरिपाठ, सामूहिक आरती आणि प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला.
या भव्य, भक्तिमय आणि पर्यावरणपूरक दिंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख करून देतानाच भारतीय संस्कृती, पर्यावरण संवर्धन, शिस्त, समता, सेवाभाव आणि सामाजिक मूल्यांची प्रभावी शिकवण दिली.