पंढरपूर – ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर सवलतीच्या प्रवाशांना तिकिटात सवलत देण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या एसटीकार्ड योजनेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. कार्ड आणि एसटी महामंडळाच्या तिकीट मशीनमधील सॉफ्टवेअरचा ताळमेळ बसत नसल्याने प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण झाले. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागल्याची तक्रार करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवाशांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. हे कार्ड असेल तरच संबंधित प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कार्ड काढले. मात्र, प्रत्यक्ष प्रवास करताना कार्डचा मशीनमध्ये स्वीकार होत नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामंडळाकडून लाखो कार्ड वितरित करण्यात आले असताना अनेक बसस्थानकांवर कार्डमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी किंवा त्याची प्रक्रिया करण्यासाठी मोजकीच मशीन उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कार्ड घेण्यासाठी आणि त्यामध्ये बॅलन्स भरण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या. यामुळे बसस्थानकांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
———————–
चौकट : ( परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालण्याची ग्राहक पंचायतीची मागणी )
एसटीच्या कार्डसाठी अतिरिक्त शुल्क, त्यामध्ये बॅलन्स भरण्याची प्रक्रिया आणि त्यावर आकारला जाणारा जीएसटी यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार पडत असल्याचेही ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. एसटी महामंडळाने तातडीने या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, पुरेशा प्रमाणात मशीन उपलब्ध करून द्याव्यात आणि तोपर्यंत सवलतीसाठी कार्डची सक्ती करू नये आदी मागण्यांबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत: जातीने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशीही मागणी ग्राहक पंचायतीकडून करण्यात आली आहे.
———————–
चौकट : ( तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत जुनीपध्दतच वापरावी )
एसटी कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्ड काढले; मात्र त्या तुलनेत कार्डची प्रक्रिया आणि बॅलन्ससाठी आवश्यक मशीनची संख्या अपुरी असल्याने योजनेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत जुन्या पद्धतीने सवलतीची तिकिटे देण्याची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी प्रवाशांमधूनही होत आहे.
———————–
कोट
नवीन योजना सुरू करण्यापूर्वी महामंडळाने तिची पुरेशी चाचणी करणे आवश्यक होते. कार्ड, तिकीट मशीन आणि संबंधित सॉफ्टवेअर यांचा ताळमेळ व्यवस्थित आहे की नाही, याची प्रत्यक्ष चाचणी न करता थेट योजना लागू करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. एकीकडे एसटी महामंडळाकडून प्रवाशी वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी महामंडळाच्या अशा भोंगळ कारभारामुळे एसटीचे प्रवासी कसे वाढणार ? शशिकांत हरिसाद ( सोलापूर जिल्हाध्यक्ष, ग्राहकपंचायत )
Post Views: 3