पंढरपूर – येत्या काळात होणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विठ्ठल परिवारीतील सर्व नेते मंडळीं एकत्रित येवून सर्वांच्या सहमतीने योग्य उमेदवारांची निवड करुन लढविणार असल्याची माहिती विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके यांनी दिली.
येथील भालके यांच्या कार्यालयात पंढरपूर नगरपालिका निवडणूकी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी (ता.७) दुपारी विठ्ठल परिवारातील नेते मंडळी,ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिण्यात आलेली होती. त्या बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना भगिरथ भालके यांनी बैठकी संदर्भात माहिती दिली.
यावेळी माहिती देताना भालके म्हणाले,येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूका होणार आहेत. त्यासाठी विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना आम्ही एकत्रित येण्याची विनंती केलेली होती. त्या पध्दतीने सर्व नेते मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद देवून एकत्र येण्याबद्दल सकारात्मकता दाखविलेली आहे. ज्या पध्दतीने आमचे श्रध्दास्थान, आदरणीय माजी आमदार (कै.) भारतनाना भालके यांनी आम्हाला एक शिकवण घालून दिलेली आहे की, कोणताही निर्णय अथवा भूमिका घेत असताना किंवा तो करीत असताना आपल्या सोबत काम करणाऱ्या ग्रामीण, शहरी भागातील वडीलधारी प्रमुखपदाधिकारी, तरुण सहकारी, माताभगिनी असतील पदाधिकारी असतील त्यांच्या कानावरती घालून, त्या संदर्भात त्यांच्याशी विचारविनिमय करुन त्यांची सहमती घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घ्यावयाचा. यासाठी प्राथमिक पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाला जोडलेली २२ गावे, मोहोळ मतदार संघाला जोडलेली १७ गावांमधील मंडळींची बैठक शुक्रवारी (ता.७) आयोजिण्यात आलेली होती. दरम्यान उद्या शनिवारी (ता.८) माढा मतदार संघाला जोडलेली आणि सांगोला मतदार संघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील प्रमुख गावांमधील प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील देखील इच्छुक उमेदवार सोडून जे वडिलधारी मंडळी जे भारतनानां पासून विठ्ठल परिवारात खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत अशा प्रमुख मंडळींशी चर्चा करण्यात येणार आहे. त्या नंतर या बाबतीत येत्या दोन दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांनी दिली.
———————
( प्रमुख नेतेमंडळींसोबतच आपण असणार : भालके )
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकीतील नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच १८ प्रभागातून निवडणूक लढविणारे ३६ उमेदवारां बाबत विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते मंडळीं जो निर्णय घेतील त्यांच्या बरोबर आपण असणार आहोत असे देखील यावेळी भगिरथ भालके यांनी सांगितले. कारण सर्वांशी विचारविनिमय, चर्चा करुनच योग्य तो निर्णय किंवा भूमिका घेण्याची जी विठ्ठल परिवाराची परंपरा आहे त्या नुसारच कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
——————
जी चुकीची माणसे आहेत आणि त्या सत्ता कायमस्वरुपी उध्दवस्त करणार –
यापूर्वी देखील विठ्ठल परिवारात फुट पाडायची, भांडणे लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करावयाच्या हे काही मंडळींचे काम होते. पण त्याला आळा घालण्याचे किंवा त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारतनाना भालके यांनी त्या काळात घेतलेली होती. तिच भूमिका आम्ही सगळे विठ्ठल परिवारातील प्रमुख मंडळी एकत्रित येऊन घेऊ असा आपणाला विश्वास आहे. या मध्ये जी चुकीचे माणसे आमच्या मध्ये आहेत, जी आमच्या आमच्यात वेगवेगळ्या भूमिका घेऊन फुट पाडण्याचे काम करीत आहेत अशा मंडळींना आम्ही बाजुला करुन नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना निश्चितच आम्ही त्यांची जागा दाखवुन देवु असे देखील भगिरथ भालके यांनी सांगितले.
———————–
विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या तरुणांना संधी –
या बरोबरच आगामी सर्व निडणूकांमध्ये आम्ही तरुण आणि विठ्ठल परिवारावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठ्ठल परिवारासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या मंडळींना संधी देणार असल्याचे देखील यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके यांनी सांगितले.
———————
मंगळवेढ्या बाबत देखील अशीच भूमिका –
पंढरपूर शहर, तालुक्या प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला सामोरे जाताना मंगळवेढा तालुक्या बाबत देखील आमच्या विठ्ठल परिवाराची सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांशी विचारविनिमय आणि चर्चा करुनच निर्णय किंवा भूमिका घेण्याची अशाच प्रकारची भूमिका असणार आहे असा देखील खुलासा यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांनी केला.





















