जालना : जालना शहरातील गांधी चमन येथील महिला रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून लाभार्थ्यांना कृत्रिम पायांचे वितरण केले. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना नव्याने चालण्याचा आधार मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पुनर्वसन केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच त्यांनी केंद्राच्या परिसराची पाहणी करून दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार असून, केंद्रासमोर दिव्यांगांसाठी सुसज्ज, सुरक्षित आणि आकर्षक उद्यान विकसित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. रेल्वे स्थानक आणि बसस्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना येथे सहज पोहोचता येईल आणि विविध पुनर्वसन सेवांचा अधिक प्रभावी लाभ घेता येईल.
त्यांनी पुढे सांगितले की, दिव्यांग नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, पुनर्वसन केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येतील. दिव्यांगांच्या पुनर्वसनाबरोबरच त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात कृत्रिम पाय मिळालेल्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. पुनर्वसन केंद्राच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित दिव्यांग, त्यांचे पालक तसेच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.






















