सोलापूर : शहरातील मारिआई चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडल्यानंतर विकसित करण्यात आलेला ५४ मीटर रुंदीचा रस्ता सध्या रात्रीच्या वेळी अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. मुक्ताई मंदिर ते सीएनएस हॉस्पिटल या परिसरात एकही पथदिवा नसल्याने वाहनचालक, पादचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हा रस्ता शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. दररोज हजारो वाहनांची ये-जा या मार्गावरून होत असते. परिसरात बस थांबा असल्याने रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ असते. तसेच नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र, रात्री पडताच संपूर्ण परिसर अंधारमय होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. काही दिवसांपूर्वी अंधारामुळे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला. वाहन उलटल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने चालक बचावला; मात्र या घटनेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
या मार्गावर किरकोळ अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “प्रशासनाला जाग येण्यासाठी आणखी किती अपघात व्हावे लागणार?” असा सवाल परिसरातील रहिवासी उपस्थित करत आहेत.
अंधारामुळे तळीरामांचा अड्डा
रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडत असल्याने काही ठिकाणी दारुड्यांचा वावर वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना असुरक्षित वाटत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पथदिव्यांची सुविधा उपलब्ध झाल्यास अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
तातडीने उपाययोजनांची मागणी
वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर तातडीने पथदिवे बसवून प्रकाशव्यवस्था सुरू करावी, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अंधारामुळे वाढणारा धोका लक्षात घेता प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या आहेत ठळक बाबी
– मुक्ताई मंदिर ते सीएनएस हॉस्पिटल परिसर पूर्णपणे अंधारात
– प्रमुख रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ
– बसथांबा असल्याने रात्री प्रवाशांची मोठी ये-जा
– महिलांमध्ये व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना
– तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी जोर धरतेय
Post Views: 74