देशात पावसाळा संपण्यासाठई 15 दिवस शिल्लक असतानाच अनेक राज्यांमध्ये परतीचा मान्सून कोसळतो आहे. येत्या 24 तासात उत्तरप्रदेश, झारखंडसह 16 राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यासोबतच हवामान खात्याने ओडिशातील 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील मलकानगिरी, कोरापुट, नबरंगपूर, कालाहांडी, बोलंगीर, कंधमाल येथी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात आली. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये सततच्या पावसामुळे पूर आला असून संपूर्ण शहर पाण्याने वेढलेले बेट बनले आहे. त्यामुळे लोक घरांच्या छतावर राहत आहेत.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचावकार्यात गुंतले असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येत आहे. येत्या 24 तासात देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम येथे मध्यम स्वरूपाचा आणि हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.