पंढरपूर – ५६ ते ६५ वयोगटातील बीड येथील अर्जुन रहाडे हे श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे मानकरी ठरले, ७० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील परभणी येथील सुभाष गादगे यांनी ज्येष्ठ वारकरी महावीर किताब मिळवला, तर १६ ते २५ वयोगटातील लातूर येथील गोरक्ष लंगडे हे कुमार वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी ठरले.
मानाचा फेटा, माऊली व जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, पदक, रोख रक्कम व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, औसा, लातूर व कर्नाटक येथील जवळपास १५० पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-परिसर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या आशीर्वादाने व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात याचे आयोजन करण्यात आले.
या वेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम , ह भ प तुळशीराम दा कराड, नजरुद्दीन नायकवडी, महाराष्ट्र केसरी पै. विष्णूतात्या जोशीलकर , डॉ. हनुमंत कराड, डॉ. एस. एन. पठाण, महान मल्ल नरहरी अण्णां चोरगे, सुरजीत सिंग,आणि वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा.विलास कथुरे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
बाबा निम्हण यांनी या स्पर्धेचे धावते वर्णन केले. अभय कचरे, निखल वणवे, राहुल बिराजदार, बाळासाहेब सणस, सुरेश मुंडे आणि नितिन लावंड यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले.प्रा. विलास कथुरे यांनी प्रस्तावना केली.




















