बार्शी – आमदार राजेंद्र राऊत यांच्या “हरित बार्शी” या वृक्षारोपण संकल्पाला प्रतिसाद देत सुयश विद्यालय, बार्शी येथील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्यानिमित्ताने आयोजित बाल दिंडीमध्ये वृक्षारोपणाचा अनोखा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला.
शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, मीराबाई आदी संतांच्या आकर्षक वेशभूषा परिधान करुन पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा”, “वृक्ष आहे जीवनाचा श्वास”, “पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा” अशा पर्यावरणपूरक घोषणा देत वृक्षसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.
दिंडीचे रुपांतर वृक्षारोपण मोहिमेत करत विद्यार्थ्यांच्या हस्ते करंज, आवळा, जांभूळ, वड आणि पिंपळ यासारख्या सावली देणाऱ्या व पर्यावरणासाठी उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी वृक्षांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्याची गरज विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
या उपक्रमास संस्थेचे संस्थापक श्री. शिवदास नलवडे, मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप तसेच उपमुख्याध्यापक येवले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
Post Views: 21