नागपुरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे एनडीआरएफची मदत घ्यावी लागली आहे. शहरात अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलीय.
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलेय. सीताबर्डी परिसरातील मोर भवन भागात पाणीच पाणी जमा झाले. बस स्थानकावरील बस पाण्यात बुडले. त्यासोबतच शहरातील अनेक सखोल भागात पावसाचे पाणी शिरले असून नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे. हवामान विभागाने नागपुरात आधीच ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार शुक्रवारी विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज होता. विदर्भात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. परंतु, रात्री पावसाची तीव्रता अधिकच वाढल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक वाहने आणि घरातील सामना पाण्यामुळे पूर्णपणे बुडाले होते. विक्रमी पाऊस पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नागपूरमधील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मनपातर्फे नागरिकांना विनाकारण घराच्या बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.