उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी व विजय बल्की यांनी उपोषण सोडले. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण त्यांनी मागे घेतले आहे. दरम्यान मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केले आहे की, मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या इतरही मागण्या मान्य केला आहे. ओबीसीसाठी १० लाख घरे देण्याची योजना तयार केली. राज्य सरकारला ओबीसींचे हित करायचे आहे. सर्व प्रश्न सुटले नाही मात्र प्रयत्न असणार आहे. ओबीसींच्या योजनेसाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. तसेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेडिकल प्रवेशात २७ टक्के आरक्षण देऊन संविधानिक दर्जा दिला आहे.
दरम्यान शुक्रवारी सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत ज्यांना बोलावण्यात आले नाही असे कोणाला वाटत असेल तर त्यांच्या सोबत देखील राज्य सरकार चर्चा करायला तयार आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर यांच्यासह ओबीसी वरिष्ठ नेते उपस्थित होते.ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.