ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता आहे. हा प्रवक्ता महिला आहे की पुरुष हे चौकशीत समोर येईल. त्यासाठी ही चौकशी नि:पक्षपातीपणे होणे आवश्यक आहे, असे खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच या संदर्भात माझ्याकडे इनपुट्स असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
वर्चस्वाच्या लढाईतून घोसाळकरसारख्या लोकप्रिय नगरसेवकाला संपवलं!
मुंबईतील दहिसर येथे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान हल्लेखोर मॉरिस नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली. या सर्व प्रकरणावर वडेट्टीवार बोलत होते. या हत्येच्या संदर्भातील चौकशी झाल्यानंतर आणि ही सर्व चौकशी अत्यंत नि:पक्ष होणे आवश्यक आहे. त्यातून आपल्याला मी म्हणालो तसं सत्ताधारी पक्षातील मोठी महिला किंवा पुरुषाचं नाव समोर आल्याशिवाय राहणार नाही. कारण वर्चस्वाच्या लढाईतून घोसाळकरसारख्या लोकप्रिय नगरसेवकाला संपवलं आहे. मी चौकशीच्या पूर्वी कोणाचं नाव घेणे योग्य होणार नाही. चौकशीमध्ये जे आमच्याकडे इनपुट आले आहेत, त्यातून मी बोलतो आहे. चौकशीमध्ये निष्पन्न होईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
घोटाळेबाज आणि वसुलीबाज सरकारचा हा परिपाक वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात नावाला सुद्धा कायदा सुव्यवस्था राहिली नाही. या घोटाळेबाज आणि वसुलीबाज सरकारचा हा परिपाक आहे. गेल्या महिना-दोन महिन्यातील घटना बघता, गुंडांचा मुक्त संचार आपल्या राज्यात होताना दिसतोय. घोसाळकरांवर झालेला हल्ला, हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला हा माझा स्पष्ट आरोप आहे. तेथील काही नेते त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी अभिषेक घोसाळकरांची हत्या करण्यासाठी भाग पाडलं. ज्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तो पूर्ण प्लॅन होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या, हे फार मोठं षडयंत्र आहे. सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ते आहेत, पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ते पुरुष आहेत की महिला आहेत ते लवकरच कळेल, त्यांनी रचलेल्या कटाचा घोसाळकर बळी गेले. यापूर्वीच आपण सगळ्यांनी, महाराष्ट्राने पाहिलं आहे, सत्ताधारी आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडतो, माहीममध्ये दादरमध्ये गणपती उत्सवामध्ये खुलेआम गोळीबार केला जातो. पोलीस हमारे साथ है, सरकार हमारे साथ है, हमारा कोई बाल बाका कर सकता है, या मस्तीमध्ये, गर्मीमध्ये ही सगळी मंडळी वावरताना दिसत आहे. आपण पाहिले की पुण्यामध्ये सुद्धा नवीन सीपी गेलेत आणि सगळ्यांना तंबी दिल्यानंतर सुद्धा गुंडांची मस्ती उतरली नाही. परत त्याच पद्धतीने त्यांनी दादागिरी सुरू केली. गुंडगिरी सुरू केली एकूणच राज्य आता बिहार आणि उत्तर प्रदेशापेक्षाही वाईट अवस्था दिवसेंदिवस होत चाललेली आहे. याला सर्व सत्ताधारी कारणीभूत आहेत आणि मला वाटतं की राज्य वाऱ्यावर सोडून हे सत्ता टिकवण्यासाठी आणि संपत्तीसाठी फक्त खुर्चीचा वापर करत आहेत. या पलीकडे यांच्या डोक्यात महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या रक्षणासाठी त्यांच्या हितासाठी यांना काहीही देणे घेणे नाही.