[] अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, उमरी येथील घटना , गुत्तेदाराचा मनमानी कारभार []
हदगाव तालुका प्रतिनिधी :-
तालुक्यातील उमरी ( द ) फाटा ते पिंगळी पर्यंत तीन महिन्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले व उमरीच्या बाजूला असलेल्या पुलाचे सुद्धा बांधकाम करण्यात आले परंतु हे बांधकाम गुत्तेदाराने अर्धवट केल्यामुळे या अर्धवट बांधकामाचा शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात धोका होत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी अर्धवट केलेल्या पुलाचे काम गुत्तेदाराने पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी शिवदास शंकरराव कदम यांचे शेत सर्वे नंबर १६७ उमरी येथे शेत आहे.
त्यांच्या मध्यभागी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत अर्धवट पुलाचे काम केले. त्या अर्धवट केलेल्या पुलाच्या कामामुळे नाला काढण्यात आला व काढलेला नाला अर्धवट बुजवलेला असल्यामुळे थेट नाला फोडून शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची शेती व पिक खरडून गेले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट केलेल्या पुलाचे काम पूर्ण करावे व फुटलेला नाला बरोबर करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सदरील उमरी फाटा ते पिंगळी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पाटणे गुत्तेदाराने केले असून संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचे केले आहे. पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याचे पितळ उघडे पडल्यामुळे अवघ्या दोनच महिन्यात रस्ता उखडून जाण्याच्या मार्गावर आहे.
एवढेच नाही तर ज्या- ज्या ठिकाणी सदरील गुत्तेदाराने काम केलेले आहेत ते सर्वच निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत. त्यामुळे सर्व कामाचे गुण नियंत्रण मार्फत चौकशी करण्यात यावी व सदरील गुत्तेदारांना काळया यादी टाकण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.