सोनखेड -(तभा वृत्तसेवा)
२१ ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नांदेडहून परळी वैजनाथ येथे जाताना होटलवाडी येथील शेतकऱ्याकडे पाठ फिरविल्याचे लक्षात आले….याबाबत अधिक माहिती अशी की, देशाचे कृषिमंत्री शिवसेना व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे परळी येथे दुपारी तीन वाजता स्वर्गीय पंडित पंडित अण्णा मुंडे सभा मंडप कॉटन मार्केट यार्ड नाथ रोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव या कार्यक्रमासाठी नांदेडहून परळीकडे
जात असताना वाटेतच असलेल्या होटलवाडी शिवारात येथील महिला शेतकरी सौ.शोभाबाई त्र्यंबकराव हुस्सेकर या महिलेला सन २०२१-२२ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये पोकरा योजने अंतर्गत त्यांना दोन लक्ष पन्नास हजार रुपये किमतीची अनुदानित विहीर मिळाली होती. त्या विहिरीची व कापसाच्या पिकावरील कीड रोगाची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय येणार आहेत असा शासकीय प्रोटोकॉल सहित तालुका कृषी कार्यालय लोहाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पोटपलवार यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टल वरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यासाठी सोनखेड,आंबेसांगवी,शेलगाव, होटलवाडी या भागातील शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडता येतील या उदांत हेतूने बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. तर दुसरीकडे मंत्री महोदय येणाऱ्या धास्तीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी कंधार (महसूल), उपविभागीय अधिकारी कंधार(गृह) तहसीलदार विठ्ठल परळीकर लोहा तालुका कृषी अधिकारी लोहा व पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा या सहित श्वान पथक देखील या शिवारात दाखल झाले होते.
परंतु देशाचे व राज्याचे कृषिमंत्री पद भूषविणाऱ्या कृषी मंत्र्यांनी थेट शेतकऱ्याकडेच पाठ फिरविल्यामुळे
कास्तकार वर्गामध्ये एक नाराजीचा सूर पाहायला मिळाला तर कृषी महसूल व गृह विभागाचा देखील वेळ वाया गेल्याचे लक्षात आले.
विशेष म्हणजे कृषी मंत्र्यासाठी आणलेले महाग पुष्पगुछ अखेर शेतकऱ्यांनी एसडीएम, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना भेट देऊन समाधान मानावे लागले