मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।भायखळा मतदार संघात अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या प्रशासनाच्या जमिनी आहेत. या जमिनीवर बांधकामे झालेली असून येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. ठिकाणी कामे करण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने धोरण तयार केल्यास नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील. त्यामुळे या मुद्दयाकडे माझे विशेष लक्ष असल्याचे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांनी प्रचारफेरीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट करत या विभागातील जनतेला सेवा सुविधा पुरवण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे सांगून आश्वासित केले.
एका बाजुला प्रचार आणि दुसऱ्या बाजुला प्रसार माध्यमांशी संवाद करत यामिनी जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी मला केवळ १२ दिवस मिळाले. या निवडणुकीत मी हरले नही तर केवळ मला ५२ हजार मते कमी पडली आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आता लोकांना भेटणे महत्वाचे असल्याने त्यानुसार प्रचार सुरु असून आपण या प्रचार रॅलीतील गर्दी आणि रॅलीदरम्यान लोकांचा मिळणारा प्रतिसाद आपण स्वत:ही पाहत आहात असे सांगितले. माझ्या विरोधात कोण आहे यापेक्षा मला जनतेची कोणती कामे करायची आहे यावर मी बोलेन असे सांगत यामिनी जाधव यांनी लकडा बंदरमध्ये नौदलाचे मुख्यालय असून त्याठिकाणी समुद्रात गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालय नाही. त्यांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात. त्यांना आमदार निधी शेड उभारुन दिली आहे आणि समुद्रात गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक स्पीड बोट नाही, तीसुध्दा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असून मी हा विषय हाती घेतला आहे,असे त्या म्हणाल्या.
नागपाडा, मदनपाडा य भागात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या अधिक असल्याने याठिकाणी समुह पुनर्विकास होणे गरजेचे आहे. समुह पुनर्विकासाला गती येण्यासाठी ४ हजार मीटरची मर्यादा थोडी शिथिल करण्याची गरज आहे. ते झाल्यास मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागेल,असा विश्वास व्यक्त करत त्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे यामिनी जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी कच्छी लोहानापासून सुरु झालेली प्रचार रॅली चैत्य टॉवर, राजा शिवाजी, कॉपर कॅस्टर, हमजा टॉवर, प्रेरणा टॉवर, इराणी वाडी, साई निकेतन, पदमशी वाडी, सैफी टॉवर, गुरु हिंमत बिल्डींग, सरकार रेसीडेन्सी, हसनाबाग, सीताफळ वाडी, रुस्तमबाग व आसपाच्या परिसरात समारोप झाला आणि त्यानंतर संध्याकाळी चिंचपोकळी दत्ताराम लाड मार्गापासून सुरु झालेली प्रचार फेरी डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, अनंत गणपत पवार मार्ग, रामभाऊ भोगले मार्ग, हरिश अर्जुन पालव मार्ग, उमेश साळुंखे मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, केशवराव बोरकर मार्ग, दादोजी कोंडदेव मार्ग, घोडपदेव क्रॉस रोड १, २, ३ मार्ग, के आर म्हात्रे मार्ग, डॉ म्हस्कारंस रोड व संत सावता माळी येथील जुन्या चाळी, इमारती व दुकानदारांच्या भेटी घेताना यामिनी जाधव यांना लोकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत होता. मतदारांकडून केले जाणारे औक्ष्ण, भेटी गाठी आणि संवाद यातूनही नियोजित वेळेत रॅली पूर्ण करण्याचा प्रयत्न यामिनी जाधव आणि त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून केला जात होता.