मंगळवेढा – मंगळवेढा शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची दूधाची मागणी वाढल्याने म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध भेसळ करुन ग्राहकांची माथी मारले जात असल्याचा प्रकार घडत असून याकडे अन्न औषध प्रशासनाचे येथे नेमलेले कर्मचारी मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्यामुळे तेरी भी चूप,मेरी भी चूप अशा प्रतिक्रीया सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत असून सोलापूरच्या अन्न औषध प्रशासनचे आयुक्त यांनी मंगळवेढ्यात गांभीर्यपुर्वक लक्ष घालून कुचराई करणार्या त्या अधिकार्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शहरवाशीयामधून पुढे येत आहे.
नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूधाची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे लक्षात घेवून दूध डेअरी वाल्यांनी चक्क म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध भेसळ करुन आपले उखळ पांढरे करुन घेतल्याने ग्राहकामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या दिपावली उत्सव चालू असल्यामुळे दूधाची मागणी घरोघरी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जर्शी गायीचे दूध भेसळ करण्याचा प्रकारही वाढत आहे. भेसळीचे दूध घरी नेवून तापवल्यानंतर पिवळी साय येवून चवीलाही बेचव लागत असल्याचे अनेकांनी सांगीतले. जर्शी गायीचे दूध हे स्वत: दरात विकले जाते दर म्हशीचे दूध महाग दरात विकले जाते. याचा फायदा घेण्यासाठी जर्शी गायीचे कमी दरातले दूध म्हशीच्या दूधात भेसळ केल्याने म्हशीच्या दराने ते दूध विकून दूधवाले मालामाल होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. मंगळेवढ्याला नेमलेल्या अन्न भेसळचे अधिकारी मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्यामुळे भेसळ करणार्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात पानटपर्यावरुन मोठ्या प्रमाणात गुटखा,मावा खुलेआम सुरु असतानाही कारवाई केली जात नाही. विधानसभेत गुटख्याविरुध्द विरोधकांनी आवाज उठविल्यावर अन्न भेसळ प्रशासन खडबडून जागे झाले व मंगळवेढ्यात केवळ एकावर कारवाई करुन डोंगर पोखरुन उंदीर काढल्याचा प्रताप केला आहे. दामाजी चौकातील एका चहा टपरीमधून विविध पदार्थाचे नमुने घेण्याचा केवळ बहाणा केला. त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. नुसते नमुने नेले जातात पुढे पुण्याला पाठविले जाते असे वारंवार सांगीतले जाते. मात्र कारवाई शुन्य आहे. या निष्क्रीय अधिकार्याला येथून बदलून सक्षम अधिकारी येथे नेमण्याची गरज या निमित्ताने मंगळवेढेकरांमधून व्यक्त होत आहे. केवळ महिन्याकाठी या परिसरात येवून हात ओले करुन ते अधिकारी निघून जात असल्याची खमंग चर्चा शहरामधून सर्वत्र सुरु आहे. अशा अधिकार्यांचा येथे काय उपयोग? अशा तिखट प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत.