नवी दिल्ली – रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे बोर्डाच्या वॉर रूमला भेट दिली. या भेटीत त्यांनी या सणाच्या हंगामातील प्रवाशांशी संबंधित घडामोडींचा आढावा घेतला. संपूर्ण आठवडा, दिवसाचे चोवीस तास काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले तसेच, दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छाही दिल्या.
सणासुदीच्या काळात प्रवाशांद्वारा मागणीत झालेल्या वाढीची पूर्तता करण्यासाठी भारतीय रेल्वेने व्यापक व्यवस्था केली आहे. पूजा, दिवाळी आणि छठच्या उत्सवादरम्यान प्रवासात अडचण येऊ नये यासाठी, यंदा भारतीय रेल्वे 12,011 विशेष गाड्या चालवत आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत 7,724 गाड्या चालवल्या गेल्या होत्या.
सणासुदीच्या हंगामात गर्दी वाढल्याच्या परिस्थितीतही प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायक व्हावा यासाठी भारतीय रेल्वे पूर्ण क्षमतेने काम करत आहे. सणाच्या निमित्ताने प्रवाशांची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने 1 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 या दरम्यान नियमित गाड्यांव्यतिरिक्त, 3,960 विशेष गाड्या यशस्वीरित्या चालवल्या आहेत.
भारतातील रेल्वेने दिवाळी आणि छठ सणानिमित्त प्रवाशांची वाढीव संख्या लक्षात घेत येत्या काही दिवसांत सुमारे 8,000 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे.
या विशेष गाड्या भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये चालवल्या जात आहेत; उत्तर रेल्वे (1919 गाड्या), मध्य रेल्वे (1998 गाड्या) आणि पश्चिम रेल्वे (1501 गाड्या) अशा सर्वाधिक गाड्यांचे नियोजन आहे. इतर झोन — जसे की पूर्व मध्य रेल्वे (1217) आणि उत्तर पश्चिम रेल्वेने (1217) प्रादेशिक प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सेवा उपलब्ध केल्या आहेत. एकूण 12,011 गाड्यांचे झोननिहाय वितरण पुढे दिले आहे.