बार्शी – प्रत्येक घरात संस्कारी मुलगा तयार झाला तर नक्कीच चांगला समाज निर्माण होईल. जास्त कायदे असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही. लोक नियमांचे पालन करत नाहीत म्हणून कायदे तयार करावे लगातात. लोकांनी आपसातील मतभेद, वाद लोकअदालतमध्ये मिटवून पैशाची व वेळेची बचत करावी, असे प्रतिपादन सह. दिवाणी न्यायधीश क. स्तर पी. व्ही राऊत यांनी व्यक्त केले.
त्या चिखर्डे (ता. बार्शी) येथे बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरते लोकअदालत व कायदेविषयक जनजागृती शिबिरात बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलण्याची गरज असून प्रत्येकाने नियमाने व कायद्याने वागल्यास चांगला समाज निर्माण होईल, असे सांगितले. युवक चांगले संस्कारी असल्यास चांगला समाज घडेल अन्यथा भविष्यात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
प्रस्ताविकात बार्शी वकील संघांचे अध्यक्ष विधीज्ञ आर. एन. गुंड यांनी समोपचाराने दिवाणी केसेस मिटवल्या तर लोकांची वेळेची व पैशाची बचत होते. तसेच न्यायालयावरील कामाचा ताण कमी होईल. त्यासाठीच असे उपक्रम राबवले जातात. लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे सांगितले.
विधीज्ञ अक्षय पाटील, विधीज्ञ पांडुरंग घोलप, विधीज्ञ संजय कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विधीज्ञ उषा पवार, विधीज्ञ अभि कदम, चिखर्डे येथील अमित कोंढरे, बापू देवकर, निशांत मोहिते, कोकिळा जंगले, अंबिका परिहार, ग्रामविकास अधिकारी माने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, पांगरी पोलीस स्टेशनचा कर्मचारी, चिखर्डे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
















