सोलापूर : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम दि. १० जानेवारी २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करावे.ठरविलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास टेंडरमधील अटी व शर्तींनुसार मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल. प्रती दिन १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच मक्तेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये कायमस्वरूपी टाकण्यात येईल.कुठल्याच निविदा प्रक्रियेमध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही, अशी नोटीस महापालिका प्रशासनाने संबंधित मक्तेदाराला बजावली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण योजना सन २०२२-२३ अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम ठेकेदार सुरज दादासाहेब शिंदे (रा. दिघी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या नावे मंजूर करण्यात आले आहे. या कामाची वर्कऑर्डर दिनांक ४ मार्च २०२४ रोजी देण्यात आली असून, ठरविलेल्या अटींनुसार कामाची मुदत ६ महिने निश्चित करण्यात आली होती. तथापि, या कालावधीत काम समाधानकारकरीत्या पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले. दि. २९ मे २०२५ रोजी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत काम बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतरही काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे संबंधित ठेकेदारास नोटीस क्र.०१ व क्र.०२ देण्यात आल्या असून, काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले होते.
दरम्यान, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली असता, कामाची गती अत्यंत मंद असल्याचे मत त्यांनी नोंदविले. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींकडूनही या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.या परिस्थितीचा विचार करता सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास तातडीने युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेवर आणि वेळेत पूर्णतेवर भर देत, नागरिकांना उत्तम दर्जाचे आणि आकर्षक सार्वजनिक ठिकाण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले आहे.
संबंधित ठेकेदाराने तातडीने काम पूर्ण करणे आवश्यक : आयुक्त डॉ. ओम्बासे
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या संदर्भात सांगितले की, “श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम हे शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीशी निगडीत महत्त्वाचे आहे. या कामात होणारा विलंब नागरिकांना अस्वस्थ करणारा असून, संबंधित ठेकेदाराने तातडीने काम पूर्ण करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या वतीने कामाच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल.”
























