सोलापूर : वृत्तपत्रे ही माणसांचा श्वास अन् संजीवनी आहेत. पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. ज्यावेळी निराशजनक स्थिती वाटेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन आठवावा. त्यामुळे जीवनात त्रास जाणवणार नाही, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी येथे केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज शिवस्मारक सभागृहात पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा डॉ. शिवरत्न शेटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत जोशी, दैनिक दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, दैनिक एकमतचे संपादक संजय येऊलकर, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनेल प्रमुख समाधान वाघमोडे, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कव्हेकर, दशरथ वडतिले, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शेटे पुढे म्हणाले, वृत्तपत्रांचा खप कमी अधिक होऊ शकतो पण ते कधीच संपणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. धकाधकीच्या जीवनात त्याकडे दुर्लक्ष होते.
संपादक सिद्धाराम पाटील यांनी कालची आणि आजची अत्याधुनिक पत्रकारिता यावर भाष्य केले. सद्यस्थितीत ए.आय. तंत्रज्ञान अधिक विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माध्यमांमध्ये मोठा बदल होणार आहे. ते बदल आता स्वीकारले पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध माध्यमांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.. तर राज्यकर्ते स्वैराचाराकडे
वळणार नाहीत : उमेश पाटील
यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, पत्रकारितेतील सकारात्मक बदलाचा स्वीकार केला पाहिजे. आपण राजकारणात आलो नसतो तर निश्चितच पत्रकार झालो असतो. विद्यार्थी दशेपासून वृत्तपत्र वाचनाची सवय होती, त्याचा आजही उपयोग होत आहे. जशी प्रजा तसा राजा असे सांगतानाच प्रजेचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. पत्रकारितेचा चौथा स्तंभ सक्षम राहिला तर लोकशाही सक्षम राहील. त्यामुळे राज्यकर्ते स्वैराचाराकडे वळणार नाहीत. निवडणुका बिनविरोध व्हायला नको. या माध्यमातूनच हुकूमशाहीकडे वाटचाल होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यांचा झाला विशेष सन्मान
ज्येष्ठ दिवंगत पत्रकार वि.शी. वस्त्रे यांची नात कु. सिद्धी वस्त्रे यांची मोहोळच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आणि जीवनधारा अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत भरले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रति वर्षाप्रमाणे धोंडोपंत नृसिंह देशपांडे यांच्या स्मरणार्थ
दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात प्रथम आलेल्या माधुरी शंकर नवले यांचा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. श्रावणी उमेश कदम हिच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक उमेश कदम यांच्याकडून श्लोक माधव येच्चे यास शैक्षणिक मदत देण्यात आली.


















