बार्शी – टेंभुर्णी, ता. माढा येथील क्रेटा सुपर फॉस्फेट या दाणेदार चुकीच्या, बोगस व भेसळ युक्त दाणेदार खतामुळे बार्शी व माढा तालुक्यातील अनेक द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीं वर्षभर प्रचंड खर्च करुन, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम झाले आहे. तयार झालेला कांदा व द्राक्ष बागा जळून खाक झालेल्या आहेत. या बागा पुन्हा या अवस्थेत येण्यासाठी तीन वर्षाच्या पुढील कालावधी लागणार आहे. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये नुकसान या चुकीच्या क्रेटा कंपनीच्या खतामुळे झालेले आहे.
या खत कंपनीचे मालक टेंभुर्णी येथील येवले यांनी, मागील २५ दिवसांपासून होत असलेल्या माढा व बार्शी तालुक्यातील कापसी, यावली या भागातील शेतकऱ्यांचे शेतावर जाऊन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड, स्वाभिमानीचे शरद भालेकर, समाधान भालेकर व जनहित शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रामभाऊ काटे यांनी जळालेल्या कांदा उत्पादक व द्राक्ष बागांची पाहणी केली.
यावेळी बोलताना शंकर गायकवाड म्हणाले की, २५ दिवस होत आले तरी अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान होऊनही या शेतकऱ्यांना एक रुपयाची सुद्धा मदत या खत कंपनीने केलेली नाही.
या क्रेटा कंपनीच्या मालकाने स्वतः शेतावरती जाऊन पाहणी करावी व तात्काळ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा लवकरच या कंपनीवर व त्या मालकाच्या घरावर आंदोलन करु. त्यावेळी वैतागलेले शेतकरी खत व औषध कंपनीच्या मालकाला खतात बुडवून मारतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिला. त्याचबरोबर कृषी आयुक्त पुणे आणि कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनीही तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास भाग पाडावे अन्यथा त्यांच्याही घर व कार्यालयासमोर आंदोलने केली जातील, असाही इशारा गायकवाड यांनी दिला. त्यावेळी नुकसान झालेल्या बार्शी व माढा तालुक्यातील कापशी व यावली गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.




















