पाथरी ते इंजेगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभे दरम्यान शनिवारी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टॉवर वर चढुन लक्षवेधी आंदोलन केले. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी परभणी येथे आले असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब मधील पाथरी ते इंजेगाव या भागाचे काम गेल्या सात वर्षा पासून प्रलंबित आहे.
पाच वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी या कामाचे उद्घाटन केले होते.पण या रस्त्यावर एक खडाही टाकला नाही. या भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील खड्डयामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दि.२५ रोजी नितीन गडकरी यांच्या सभे दरम्यान त्यांचे लक्ष या प्रलंबित कामाकडे वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, सोमनाथ नागुरे यांनी विटा पुलाजवळील मोबाईल टॉवर वर चढुन आंदोलन केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण सुरु होताच कार्यकर्ते टॉवर वर चढले . टॉवर वर चढुन त्यांनी पाथरी इंजेगाव रस्ता तातडीने सुरु करण्याच्या घोषणाबाजी केली.
या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, फौजदार अमर केंद्रे ,कुंडलिक वंजारे व गृहरक्षक दलाच्या जवानांनी आंदोलन कर्त्यांना खाली उतरवले यावेळी नायब तहसीलदार अनिल घनसावंत हे ही या ठिकाणी उपस्थित होते . नितीन गडकरी यांचे भाषण संपल्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी भाषणात रस्त्यासाठी निधीची घोषणा केल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन कर्ते खाली उतरले. त्या नंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस स्थानकात नेऊन कारवाई करून सोडले.
निधीच्या घोषणा व उद्घाटने नेहमीचीच पाथरी ते इंजेगाव या रस्त्याचे उद्घाटन हे नितीन गडकरी यांनी पाच वर्षांपूर्वी केले होते .आता पुन्हा या रस्त्याला निधी उपलब्ध करण्याची घोषणा ही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे .या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे ही नागरीकांची मागणी आहे ती तातडीने पुर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू
असा इशारा सुधीर बिंदू व आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.