सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने आज पुन्हा कस्तुरबा मंडई आणि बाळीवेस परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. टपरी चालकांची अरेरावी केली तर एका महिलेने थेट महापालिकेच्या गाडीसमोर लोटांगण घातले. या ठिकाणी विरोधाला न जुमानता अखेर कारवाई पूर्ण करण्यात आली. दोन खोके, एक दाल चावलची गाडी केली निष्काशीत करण्यात आली.
सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची शहरभर धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारी बाळीवेस कस्तुरबा मार्केट परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान टपरी चालक व फेरीवाले यांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करत कारवाईला विरोध केला. या वेळी एका दाल-चावल गाडी चालवणाऱ्या महिलेने महापालिकेच्या वाहनासमोरच लोटांगण घालत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
कस्तुरबा मार्केट हा शहरातील वर्दळीचा भाग असून येथे मोठ्या प्रमाणावर अवैध टपऱ्या व फेरी व्यवसाय सुरू असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी सकाळी कारवाई हाती घेतली. मात्र, कारवाई सुरू होताच संबंधित टपरी चालक आणि फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत जोरदार आरडाओरडा केला. दरम्यान, एका महिला फेरीवाल्याने ‘माझी गाडी भरून घेतल्याशिवाय मी उठणार नाही,’ अशी भूमिका घेत थेट अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोरच लोटांगण घातले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अखेर संबंधित महिलेला समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलीस बंदोबस्तात विरोधाला न जुमानता अखेर कारवाई पूर्ण करण्यात आली. दोन खोके, एक दालचावलची गाडी केली निष्काशीत करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली या विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक रस्ते व बाजारपेठा अतिक्रमणमुक्त ठेवणे, वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने कठोर कारवाई करावी लागत आहे. यापुढेही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.


















