सोलापूर – श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी दिलेल्या अभूतपूर्व बलिदानाची प्रेरणा समाजापर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हा या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत.
शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, प्रभात फेऱ्या तसेच जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
प्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले भक्तिगीत शाळा व सार्वजनिक ठिकाणी प्रसारित केले जाणार आहे. तसेच गुरुजींच्या जीवनावर आधारित माहितीपटही विद्यार्थ्यांना व नागरिकांना दाखवण्यात येणार आहेत. सहभागी संस्थांनी आपल्या उपक्रमांची माहिती आणि जिओ-टॅग केलेले छायाचित्रे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
१० ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण विभागात ‘आरोग्य पंधरवडा’ राबवण्यात येत असून, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रांत विशेष स्वच्छता मोहिमा, प्रभात फेऱ्या आणि ग्रामसभांद्वारे जनजागृती केली जात आहे. नवी मुंबई (खारघर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मुख्य सोहळ्यासाठी भाविकांच्या सोयीसाठी विशेष बस सेवेचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याची माहितीही विभागीय आयुक्तांनी दिली. सर्व समाजघटकांनी या ऐतिहासिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

























