सोलापूर – शेळगी परिसरात श्री संत रविदास बहुद्देशीय सामाजिक संस्था, शेळगी यांच्या वतीने गुरु रविदास यांची ६४९ वी जयंती १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या जयंती उत्सवात धार्मिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
१४ फेब्रुवारी रोजी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. कल्लप्पा महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मुलानी, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, ह.भ.प. बळीराम जांभळे महाराज, संस्थापक अध्यक्ष मेजर वसंत सपताळे आणि ह.भ.प. मंगेशजी कुलकर्णी यांच्या हस्ते महापूजन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन, पारायण व महाप्रसादाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
१५ फेब्रुवारी रोजी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात पदोन्नती मिळविलेल्या मान्यवरांचा व सोलापूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील गरजू महिलांना साड्यांचे वाटप करून जयंतीची सांगता करण्यात आली. याउपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक सेवेची जोड मिळाली. कार्यक्रमास वैशाली कोनापूरे, प्रकाश बिराजदार, अशोक लामतुरे, केदार पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सचिवा जयश्री सपताळे व खजिनदार वैशाली गायकवाड यांनी प्रस्तावना केली.
“मन चंगा तो कठौती में गंगा” या उक्तीचा संदर्भ देत मेजर वसंत सपताळे यांनी मन शुद्ध असेल तर सर्व कार्य सफल होते, असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत विचारांची जयंती साजरी करणारी ही चळवळ प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मारुती जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप कांबळे यांनी केले. उत्सव यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.



















