सोलापूर : सोशल महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सोशल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. वडजे यांनी आपत्ती ओळखून त्यावर योग्य व तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी जपत नेतृत्व स्वीकारणे आणि समस्यांचे परिणामकारक निराकरण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतासारख्या युवा देशात युवकांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारून समाज व देशावर येणाऱ्या आपत्तींचा समर्थपणे सामना करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. दंडे म्हणाले की, एकदा नेतृत्व स्वीकारले की ते कणखर असले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत नेतृत्वापासून मागे हटता कामा नये. व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जे. के. मुल्ला तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक नारायणकर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक नारायणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रहीसा मिर्झा यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. वंदना भानप यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन प्रा. तबस्सुम मोमीन यांनी केले.
कार्यशाळेस विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे दीडशे स्वयंसेवक तसेच जवळपास वीस कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी ‘कुशल नेतृत्व व सातत्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी प्रतिबंध व बॉम्बशोधक पथकाविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पोलीस मुख्यालयातून श्री. अविनाश पाटील, श्री. प्रवीण भोपळे, नासिर बागवान, अनंत कोकरे, सचिन आंबलगी तसेच श्री. रामपुरे उपस्थित होते. त्यांनी सायबर गुन्हेगारी व बॉम्बशोधक पथकाच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती देत प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी डॉ. श्रीनिवास जगताप, डॉ. अण्णासाहेब साखरे, डॉ. युवराज सुरवसे, डॉ. पाटणकर मॅडम, डॉ. सिदम मॅडम तसेच डॉ. अमोल शिंदे उपस्थित होते.
तीन दिवस चालणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, सामाजिक जाणीव व आपत्ती व्यवस्थापनाबाबतची तयारी विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


























